नवी दिल्ली : राज्यस्थानचा सत्तासंघर्ष काही केल्या थांबत नाही. त्यातच आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे. तसेच गेहलोत यांनी लवकरच विधानसभा अधिवेशन बोलावणार असल्याची माहिती दिली आहे. गेहलोत आणि पायलट कॅम्पमध्ये कायदेशीर लढाई सुरु असतानाच अशोक गेहलोत यांनी हे वक्तव्य केले आहे.
अशोक गेहलोत यांनी जयपूर याविषयी माहिती दिली आहे.“लवकरच विधानसभा अधिवेशन पार पडणार आहे. आमच्याकडे सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा असून बहुमत आहे. सर्व काँग्रेस आमदार एकत्र आहेत”. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. अशोक गेहलोत कॅम्पला सध्याच्या राजकीय परिस्थितीशी सामना करण्यासाठी लवकरात लवकर अधिवेशन बोलावलं जावं असं वाटत आहे. सूत्रांनुसार, पुढील आठवड्यात अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वातील सरकारने छोटे अधिवेशन बोलावले जर त्यामध्ये राज्य सरकार आपली बाजू किती भक्कम आहे हे दाखवू शकते असे सांगण्यात येत आहे. तसेच या मार्गाने सचिन पायलट यांच्यासोबत केलेल्या बंडखोर आमदारांना अधिवेशनात सहभागी होण्यासाठी भाग पाडलं जाऊ शकते असे गेहलोत समर्थक आमदारांचे म्हणणे आहे. व्हीप दिल्यानंतरही आमदार हजर न राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी योग्य कारण मिळेल असे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय सचिन पायलट समर्थक आमदारांनी जयपूरमधील अधिवेशनात हजेरी लावल्यास त्यातील काही जणांना पुन्हा मागे फिरण्यासाठी प्रवृत्त केले जाऊ शकते असाही गेहलोत समर्थकांना विश्वास आहे.
दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी सचिन पायलट यांच्यासह १९ आमदारांना अपात्र घोषित करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. या नोटीसीला पायलट समर्थक आमदारांनी उच्च न्यायालायत आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी करताना राजस्थान उच्च न्यायालयाने १९ आमदारांच्या नोटीसीवर २४ जुलैपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. विधानसभेचे अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष जोशी यांनी केलेली मागणी फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या सुनावणीवर स्थगिती आणण्यास नकार दिल्याने २४ जुलै रोजी राजस्थान उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उच्च न्यायालय काय निकाल देते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.