आळंदी -संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी (725) संजीवन समाधी सोहळ्याला तीर्थक्षेत्र आळंदी येथे दिंड्या घेऊन आलेले वारकरी आता परतीच्या मार्गावर आहेत.
खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ, विणा, पखवाज घेऊन आम्ही जातो आमुच्या गावा । आमुचा रामराम घ्यावा ।। असे अभंग गात वारकरी आपापल्या गावी परतत आहे. गुरूवारी माऊलींचा 725वा संजीवन समाधी सोहळा पार पडला.
या दरम्यान यंदाच्या कार्तिकी वारीत मंदिर स्वच्छतेचे काम स्वकाम सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले. त्यांचा यथोचित सन्मान देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी केला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर, महिला अध्यक्षा आशा तापकीर मंडळाचे आधारस्तंभ स्वामी गावडे, यांसह अनेक सेवेकरी उपस्थित होते.
यंदाच्या कार्तिकी वारीत आळंदीतील माऊली मंदिरात सुमारे दीडशे स्वयंसेवकांनी मंदिर स्वच्छतेचा उपक्रम राबवून मंदिरात भाविकांना पाणी वाटप, मास्क वाटप, चहापान, खिचडी वाटप तसेच दर्शन बारीतील स्वच्छता, देणगी विभागात कॅश काउंटिंग अशी सेवा 24 तास राबविण्यात आली.
संपूर्ण यात्रा काळात आळंदी देवाची पोलीस स्टेशन, दिघी पोलीस स्टेशन, आळंदी नगरपरिषद, महावितरण, आळंदी देवस्थान, आळंदी ग्रामीण रुग्णालय, आळंदी महसूल विभाग खेड व इतर सर्व शासकीय घटकांनी आपापली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्याने आळंदीकरांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.