मुंबई – राज्यात गेल्या दोन वर्षापासून भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधतात. गेल्या अधिवेशनापासून मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून चंद्रकांत पाटील शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना सतत टार्गेट करत आहेत. त्यावरून आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे.
चंद्रकांत दादा हे चांगला माणूस कसा बिघडतो त्याचे उदाहरण आहेत, सत्ता मिळत नाहीये, त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. अशी घाणाघाती टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच हा अतिशहाणपणाचा सल्ला भारतीय जनता पक्षाचे लोक देत आहेत तो त्यांनी देण्याची गरज नाही, आम्हाला आनंद आहे ते आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री पदांवर राहून करोनाच्या काळातही जनतेला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
उद्धव ठाकरे यांनी देशपातळीवर मुख्यमंत्री म्हणून नाव लौकिक गाजवला आहे, असेही विनायक राऊत म्हणाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या लोकांना अशा पद्धतीने डिवचणे किंबहुना थयथयाट करणे किंबहुना मुख्यमंत्र्यांच्या नावाने टीका करणे याशिवाय आता कुठलाही धंदा नाही, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच शिवसेनेचा आकड्यांची मुख्यमंत्री दखल घेतील, पक्षातील बदलाचाही विचार करतील अशी प्रतिक्रिया नगरपंचयतीच्या निकालावर विनायक राऊत यांनी दिली आहे.
शिवसेनेला संपवणारा अजून कोणी जन्माला आलेला नाही. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत, ते हसतखेळत शासन चालवत आहेत त्याच्यामध्ये द्वेष निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.