मुंबई – फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत माध्यमांशी बोलण्यास नकार दिल्यामुळे जपानच्या नाओमी ओसाकावर कारवाई झाली. मात्र, तिनेही टोकाचा निर्णय घेत स्पर्धेतूनच अंग काढून घेतले. तिच्यासारखे धैर्य आमच्याकडे नाही, आम्हाला माध्यमांची गरज आहे, असे मत भारतीय महिला कसोटी संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केले आहे.
बायोबबल वातावरणात राहणे आव्हानात्मक आहे. तरीही भारतीय महिला क्रिकेटपटू माध्यमांना टाळू शकत नाहीत, कारण त्यांना माध्यमांची गरज असते. ओसाकाने फ्रेंच ओपनमधून माघार घेतली. पहिल्या फेरीतील सामन्यानंतर ओसाकाने माध्यमांशी बोलणे टाळले, त्यामुळे तिला 15 हजार डॉलर्सचा दंड बसला.
या कारवाईनंतर ओसाकाने स्पर्धेतून माघार घेण्याचे ठरवले. तिने दाखवलेली हिंमत आम्ही दाखवू शकत नाही. पत्रकारांशी बोलणे टाळावे किंवा पत्रकार परिषद चुकवली तरी चालेल, असे मला कधीच वाटले नाही. कारण महिला क्रिकेटला माध्यमांचा पाठिंबा आवश्यक आहे आणि खेळाच्या विकासात मदत करणे हे खेळाडूंसाठीही महत्त्वाचे आहे, असेही मिताली म्हणाली.
भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडला रवाना होत असून, सात वर्षांनंतर संघ कसोटी सामना खेळणार आहे. येत्या 16 ते 19 जून या कालावधीत भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध खेळेल.