मुंबई – खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अतिशय चुकीचे वक्तव्य केले असून महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. आम्ही पण खूप काही बोलू शकतो, पण आपल्या संस्कृतीचा विचार करुन गप्प बसतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी(दि.26) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात विविध घडामोडींबाबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही पसंत पडले नसेल. राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना असे नेते काही बोलून जातात आणि माध्यमात तेच दाखवले जाते. त्यामुळे राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी तारतम्य ठेवून वक्तव्य केले पाहीजे. कुठलाही समाज किंवा महिलावर्गाच्या भावना दुखावल्या जातील, असे बोलता कामा नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.