औरंगाबाद – मातोश्रीवरून आलेला प्रत्येक आदेश आपल्याला शिरसावंद्य असून मी आणि अंबादास दानवे औरंगाबादमध्ये शिवसेना वाढवण्याच्या कामाला जोमाने लागलो आहोत. शिवसेनेतून जे फुटले त्यांना आम्ही दोघेच पुरेसे आहोत आम्ही बंडखोरांना आडवं करू, असे प्रतिपादन शिवसेना नेते माजी खासदार चंदक्रात खैरे यांनी केले आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज येथे खैरे यांची भेट घेतली. त्यानंतर खैरे पत्रकार परिषदेत बोलत होते. खैरे यांनी चंद्रकांत भुमरे, संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार या एकनाथ शिंदे गटात गेलेल्यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक होण्याचे संकेत यानिमित्ताने दिल्याचे मानले जात आहे. अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते म्हणून चांगली कामगिरी नोंदवतील असा विश्वासही त्यांनी केला.
खैरे म्हणाले की, दानवे यांनी राज्यात सर्वत्र फिरून चांगला अभ्यास केला आहे. त्यांच्यात आणि माझ्यात अनेक मतभेद होते. कोणत्याही कुटुंबात मतभेद होतच असतात. पण आता आम्ही हे मतभेद विसरून एकत्र काम करण्याचे ठरवले आहे असेही खैरे यांनी नमूद केले. दानवे यांची विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर दानवे आज खैरे यांच्या भेटीला आले होते. दानवे म्हणाले की, मी खैरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.