मुंबई: लोकसभा निवडणुकाकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सुपडा साफ केला. राष्ट्रवादीला ४ तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फेसबुक पोस्टव्दारे मोदींचे अभिनंद केले. आणि आगामी विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे म्हटले आहे.
जयंत पाटलांची संपूर्ण फेसबुक पोस्ट
“सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी कष्ट घेणाऱ्या सर्व लाखो कार्यकर्त्यांचे आणि सर्व स्थानिक नेत्यांचे आभार मानतो. केवळ लोकसभा निवडणुकीच्या काळातच नव्हे तर गेली पाच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी आणि मूलतत्त्ववादी विचारसरणीच्या पराभवासाठी जी मेहनत सर्व कार्यकर्त्यांनी घेतली ती अजोड होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे चार खासदार निवडून आले त्याचे संपूर्ण श्रेय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे व स्थानिक नेत्यांचे आहे.
लोकसभा निवडणुकीत आपल्या नऊ ते बारा जागा येतील अशी आम्हाला खात्री होती. मात्र पाच जागांवर आम्हाला समाधान मानावे लागले.
लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते, सर्वोच्य असते ! जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. जनतेचा कौल मिळवून अविश्वसनीय विजय संपादित केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन !
पाच वर्षात भारताचं संविधान, धर्मनिरपेक्षता व बहूसांस्कृतिकता यांच्या गळ्याला नख लावण्याचे भरपूर प्रयत्न झाले. आम्ही भ्रष्टाचार, महागाई व बेरोजगारीच्या विरोधात आपण प्रामाणिकपणे लढलो, यापुढेही लढत राहू.
देशभरात ईव्हीएम बाबतीत विविध गैरप्रकार समोर आले आहेत. त्यावर कायमस्वरूपी समाधान काढणे गरजेचे आहे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक न झाल्यास देशातील जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांमधील चर्चेचा अवकाश पूर्णपणे वेगळा असेल. राज्यात भयानक दुष्काळ पडला असून राज्य सरकार गेली पाच वर्षांप्रमाणे आजही बेफिकीरपणे कारभार करते आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत या जनविरोधी राज्य सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आम्ही सज्ज आहोत”.