नाशिक – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे धुळे येथे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांनिमित्त नाशिकमार्गे जात आहेत. तत्पूर्वी त्यांनी नाशिकमध्ये छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच आज शरद पवार हे नाशिक मुक्कामी आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे, अशात उद्या जरी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत.. असे सांगतानाच निवडणुका होणार नसतील तरी राज्य एकंदर कोणत्या परिस्थितीत चाललेय त्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. काही कमतरता आणि चुका असतील त्यासंबंधीची भूमिका त्या-त्या वेळी घेतली जाईल. त्यामुळे आम्ही बांधलेली राजकीय बांधणी अजिबात विस्कळीत होणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
यावेळी मंत्रीमंडळ विस्तारावरून शिंदे सरकारवर टीका करताना पवार म्हणाले की, राज्यात नवीन सरकार येऊन एक महिना झालाय. अद्यापही राज्याला मंत्री नाहीत. मंत्रिमंडळ विस्ताराला इतका विलंब योग्य नाही. राज्यात पूरपरिस्थिती असताना काम करण्यासाठी मंत्रिमंडळ टीम आवश्यक आहे. विरोधी पक्षाचे नेते संकटातील लोकांच्या भेटी घत आहे. मुख्यमंत्र्यांनी यातून बोध घ्यावा. स्वत:च कार्यक्रम घ्यायचे की शेतकऱ्यांच्या भेटी घ्यायच्या हे तुमचे तुम्हीच बघा, असे पवार म्हणाले.
ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलताना पवार म्हणाले की, आरक्षणाबाबतचा निर्णय हाती आल्याशिवाय भाष्य करणे योग्य नाही. परंतु प्रथमदर्शनी वाचनानंतर परिस्थिती चिंताजनक आहे. ओबीसी हा मोठा वर्ग या संबंध सत्तेच्या आणि प्रशासनाच्या बाहेर फेकला जाईल, अशी चिंता शरद पवार यांनी व्यक्त केली.