नगर (प्रतिनिधी) – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात देशात सर्वाधिक अर्थिक फटका सलून व्यावसायिकांनाच बसला.आता अनलॉक झाल्यानंतर देखील अजुनही सलून व्यावसाय अडचणीतच आहेत. अशावेळी किमान करोना लसीकरणात सलून व्यावसायिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ, अहमदनगर जिल्हा नाभिक समाज ट्रस्ट व अहमदनगर जिल्हा सलून चालक-मालक असोसिएशनतर्फे करण्यात आली.
आमदार संग्राम जगताप यांना या संदर्भातील निवेदन आज देण्यात आले. लसीकरणासाठी राज्य सरकारकडे आमदार जगताप यांनी आग्रह धरावा, अशी विनंती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, महाराष्ट्र नाभिक मंडळाचे राज्य कार्यकरीणी सदस्य विकास मदने, अहमदनगर जिल्हा सलून चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष जनार्दन वाघ यांच्यासह पदाधिकारी संजय मदने, किशोर मोरे, सत्तार अली शेख, भाऊसाहेब काळे, गणेश कदम, शिवाजी दळवी, अजय कदम, नीलेश शिंदे, अशोक खामकर, सुनील खंडागळे, सुरेश राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी केली.
अनलॉक झाल्यानंतर व्यवसाय सुरु करताना महाराष्ट्रातील सर्वच सलून चालक व मालकांनी करोनाविषयी दक्षता घेतली आहे. सलून निर्जंतूक करणे, तोंडला मास्क वापरणे, येणाऱ्या ग्राहकांमध्ये अंतर राहील, यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळणे, आदी महत्वाची दक्षता नाभिक समाजाने घेतली आहेच. त्यामुळे सलूनमधून करोनाचा प्रसार होण्याची शक्यता कधीही नव्हती व भविष्यात देखील नसेल, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी आमदार जगताप यांच्या पुढ्यात मांडली.
आता करोना लसीकरणात सलून चालक-मालकांना प्राधान्य दिल्यास व्यावसायिकांना त्याचा फायदा होईल. तसेच अवघा तीस टक्के सुरु असलेला व्यवसाय वाढेल. शिवाय ग्राहकही बिनधास्तपणे सलूनमध्ये येऊ शकतील, अशीही भूमिका महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जिल्हा सलून-चालक मालक असोसिएशन व अहमदनगर जिल्हा नाभिक समाज ट्रस्टच्या वतीने यावेळी मांडण्यात आली.
“त्यांना’ही मदत करावी..!
करोनाकाळात अर्थकारण अडचणीत आल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या राज्यातील सलून व्यावसायिकांना सरकारकडून अर्थिक साह्य देण्यात यावे, अशी मागणीही संघटनांतर्फे यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या संदर्भात आवर्जुन पाठपुरावा करावा, अशी विनंती संघटनांतर्फे आमदार जगताप यांच्याकडे आज करण्यात आली.