नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून सूरतमधील कोर्टाने कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे.
त्यामुळे आता केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असताना, आता केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमारांनी या विषयी प्रतिक्रिया दिली आहे.
“विधानसभा अथवा लोकसभेच्या जागा रिक्त झाल्या असतील तर तिथे पोटनिवडणूक घेण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी असतो. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली आहे; परंतु पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने त्यांना 30 दिवसांची मुदत दिली आहे.
त्यामुळे वायनाडमध्ये पोटनिवडणूक घेण्याची आम्हाला कोणतीही घाई नाही,’ असे म्हणत राजीव कुमार यांनी पोटनिवडणूक लगेच जाहीर होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर कुमार बोलत होते.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळच्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात अमेठीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता. तर वायनाडमध्ये राहुल गांधी विक्रमी मतांनी निवडून आले होते.
त्यानंतर आता राहुल गांधींना कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर वायनाडमध्ये तूर्तास तरी पोटनिवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.