राहुरी (प्रतिनिधी) – टरबूज उत्पादकांसाठी यंदाचे वर्ष आतबट्टीचे ठरले आहे. सहा ते दहा रुपये किलो दराने टरबुजाचे सव्वा लाख ते दोन लाख रुपये उत्पन्न एकरी मिळाले असते. मात्र मोठ्या शहरातील ग्राहकांच्या बाजारपेठा बंद असल्याने अडीच ते तीन रुपये किलो दराने टरबूज विकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. काही कोटी रुपयांची अपेक्षित उलाढाल जेमतेम काही लाखांचा टप्पा गाठू शकली.
एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च करून 20 ते 25 टन टरबूज उत्पादक घेतात. सहा ते दहा रुपये किलो दराने सव्वा लाख ते अडीच लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यामुळे तालुक्यात बागायती पट्ट्यात टरबूजवाड्याचे प्रमाण वाढले आहे. नदीकाठी वाळूत टरबुजाच्या वाड्याऐवजी थेट शेतात मध्यम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत टरबुजाच्या वाड्या घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे.एकट्या मल्हारवाडीमध्ये पन्नास एकरपेक्षा जास्त क्षेत्र टरबूजाखाली आहे. तालुक्यात हे क्षेत्र दोनशे एकरपेक्षाही जास्त आहे. मल्हारवाडी येथील कैलास मुसमाडे यांना एकरात साधारण 20 टन उत्पादन झाले.
मात्र टरबूज पक्क होऊन बाजारात विक्रीसाठी आणण्याची वेळ आली असतानाच लॉंकडाऊनमुळे सर्व बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे टरबूज काढणी शक्य झाली नाही. शेतातच माल खराब होऊ लागला. खराब झाल्यामुळे दीड ते दोन टन टरबूज काढून फेकून द्यावे लागले. जागेवर केवळ तीन साडेतीन रुपये किलो दराने रिक्षावाले टरबूज घेऊन गेले. गावोगाव चार ते सहा रुपये किलो दराने रिक्षावाल्यांनी टरबुजाची किरकोळ विक्री केली.गावोगावी सहजपणे स्वस्तात उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांच्या टरबूजावर उड्या पडल्या. ग्राहकांनी स्वस्तात असल्याने सढळ टरबूज खरेदी केली.
वाढीव मागणीचा मात्र थेट लाभ उत्पादकांना मिळाला नाही.
जेमतेम खर्च देखील निघू शकला नसल्याचे कैलास मुसमाडे यांनी सांगितले. मल्हारवाडीचे किशोर जाधव गेल्या सहा-सात वर्षांपासून टरबुजाची वाडी घेतात. यंदा पाच एकर क्षेत्र टरबुजाच्या वाडीचे होते. एकरी 20 टन उत्पादन मिळाले आणि भाव दहा ते बारा रुपये किलो मिळाला असता तो केवळ जागेवरच तीन ते साडेतीन रुपये किलोने टरबुजाचा द्यावा लागला.काही दिवसांसाठी सुरू झालेले फ्रुट मार्केट पुन्हा बंद झाले. परिणामी या सर्व उत्पादित शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत कसा पोचवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यामुळेच नफा तर राहू द्या, पण जेमतेम उत्पादन खर्चही निघू शकला नाही.