साताऱ्यात पाणीकपात
कास तलावाची पाणी पातळी पावणेसहा फुटावर आहे व मॉन्सूनचे आगमन पंधरा दिवस उशिरा लक्षात घेता कासचा पाणीसाठा जूनपर्यंत पोहचवयाचा आहे. नगराध्यक्षा माधवी कदम यांनी एक दिवस पाणीकपातीचे वेळापत्रक जाहीर केले असून शहरातील चाळीस वॉर्डांचा पाणीपुरवठा एक दिवसासाठी बंद राहणार आहे. श्रीकांत आंबेकर यांनी पाणी कपातीचे काटेकोर नियोजन केले आहे.
सातारा – ऐन मे चा रणरणता उन्हाळा आणि कास तलावाचा आटलेला विसर्ग यामुळे सातारा शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे . असे असताना पालिकेच्या टॅंकरचा नोझल फिल्टर खराब झाल्याने पालिकेला सातारकरांची तहान भागवण्यासाठी खाजगी टॅंकरची मदत घेण्याची वेळ आली आहे . फिल्टर च्या दुरुस्तीला कोल्हापूर गाठण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले.
साताऱ्यात निर्माण झालेली पाणीबाणी आणि मॉन्सूनच्या लांबलेल्या आगमनाची मिळालेली वर्दी यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची प्रचंड कसरत सुरू आहे. दहा द.ल.घ.मी पाण्याचा रोज उपसा व उन्हामुळे एक इंच होणारे पाण्याचे बाष्पीभवन यामुळे आधीच तहानलेल्या सातारकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. असे असताना दुष्काळात तेरावा महिना म्हणावा की काय पाच हजार लीटर क्षमता असणारी पालिकेची फायर ब्रिगेडची गाडी नादुरुस्त झाली आहे. टॅंकरच्या पाईपचा प्रेशर नोझल फिल्टरच बिघडल्याने पाणी पुरवठा विभाग प्रचंड अडचणीत आला आहे. सध्या साताऱ्याच्या पश्चिम भागात अपुरा पाणीपुरवठा व घंटेवारीचे कोलमडलेले नियोजन यामुळे टॅंकरच्या पंचवीस ते तीस फेऱ्या होत आहे. मात्र चालकांच्या दोन च शिफ्ट असल्याने कामाचा खोळंबा होत आहे.
फायर ब्रिगेडच्या जुन्या गाडीला तब्बल चौदा वर्ष झाली असून ती गाडी पाणीपुरवठ्यासाठीच वापरली जात आहे.
मात्र नोझल चा गंज आणि सर्विसिंगचा अभाव यामुळे ऐन उन्हाळ्यात साताऱ्यात पाणी टॅंकर उभा करण्याची व खाजगी टॅंकर मागवून सातारकरांची तहान भागवण्याची वेळ आली आहे. नोझल दुरूस्तीसाठी कोल्हापूरला पाठवण्यात आला आहे. खाजगी टॅंकर प्रतिफेरी तीनशे ते पाचशे रुपये दर आकारला जातो त्यामुळे खाजगी टॅंकरवाल्यांची मात्र चांदी झाली आहे. दीड हजार लीटरचे चार ट्रॅक्टर सध्या साताऱ्यात गोलाकार चकरा मारत आहेत.