पाणी प्रश्नांवर चार तास चर्चा
आयुक्तांना उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी दोन महिन्यांची मुदत
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक दिवसाआड पाणी देण्याच्या विषयावर सदस्यांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. गेली पंधरा ते वीस वर्षे केवळ कागदावर उपाययोजना आखल्या गेल्या मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे पवना धरणात पुरेसे पाणी असूनही शहरात पाणीबाणी निर्माण झाल्याची भावना सदस्यांनी मांडली. भविष्यातील 25 वर्षांचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील, असे सांगत 25 नोव्हेंबरपासून शहरात दिवसाआड पाणी देण्याच्या निर्णयावर महापौरांनी सभेमध्ये शिक्कामोर्तब केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची तहकूब व नोव्हेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा पाणी प्रश्नावर चांगलीच गाजली. सुमारे चार तास या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.
केवळ तीस नगरसदस्य यावेळी उपस्थित होते. पाण्याच्या सद्यस्थितीवर सुमारे चार तास चर्चा करण्यात आली राजू बनसोडे म्हणाले, शहरात पाण्याचे नियोजन नाही, दापोडी प्रभागातील बहुतांश भाग झोपडपट्टी युक्त आहे. हातावर पोट असलेले नागरिक आहेत काम करावे की पाणी भरावे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. वारंवार आंदोलने करुनही पाणी टंचाईचा प्रश्न सुटलेला नाही.
मंगला कदम म्हणाल्या, पाणी गळती, पम्पिंग या विषयी वर्षानुवर्षे अधिकारी तेच ते रडगाणे गात आहेत. गेल्या 15 वर्षांत अनेक उपाययोजना, प्रकल्प आणले गेले मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने आज पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आयुक्तांनी पाणी कपात केली तर त्यांना मोठा अपमान सहन करायची तयारी ठेवावी लागेल असेही कदम यावेळी म्हणाल्या.
सीमा सावळे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले. आगामी काळात पाणी प्रश्नच शहराची राजकीय दिशा ठरवेल असे मत सावळे यांनी व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या एक बाजूला चोवीस तास पाणी देण्याचे आमिष नागरिकांना दिले जाते आणि दुसरीकडे दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय लादला जात आहे.
पाणी टंचाई, दिवसाआड पाणी पुरवठा या विषयावर झालेल्या चर्चेत आशा शेंडगे, दत्ता साने, अश्विनी चिंचवडे, नीता पाडाळे, अंबरनाथ कांबळे, संगीता ताम्हाणे, अपर्णा डोके, अजित गव्हाणे, नितीन काळजे, शत्रुघ्न काटे यांच्यासह सत्ताधारी भाजपा, शिवसेना, मनसेचे गटनेते, शिवसेनेचे गटनेते व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. सदस्यांनी चर्चा केल्यानंतर महापौर जाधव म्हणाले, काही निर्णय शहराच्या भविष्यातील नियोजनासाठी घ्यावे लागतात. आयुक्तांनी तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी दिवसाआड पाणी देण्याचा उपाय सुचविला आहे यासाठी त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
अधिकाऱ्यांनी भाजपची सुपारी घेतली- वाघेरे
भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले, गेल्या अडीच वर्षांपासून पाणी टंचाई जाणवत आहे. महापालिकेत सत्तापालट झाल्यापासून हा प्रश्न अधिकच बिकट होत चालला आहे. अडीच वर्षात इतकी किती लोकसंख्या वाढली त्यामुळे पाणी प्रश्न निर्माण झाला. जाणीवपूर्वक पाण्याची टंचाई निर्माण केली जात असून अधिकारी भाजपची सुपारी घेतल्यासारखे वागत आहेत.