हिमांशू
भविष्यात पाण्यासाठी युद्धं होतील, तिसरं जागतिक युद्ध झालंच तर ते पाण्यासाठी होईल, अशी अनेक विधानं आपण पूर्वीपासून ऐकतो आहोत. अर्थात, फक्त एकाच कानानं! दुसरा कान जणू निसर्गानं आपल्याला गैरसोयीच्या गोष्टी सोडून देण्यासाठीच दिलेला असावा. पृथ्वीचं तापमान वाढत चाललंय… वाढू देत. आपण एअर कंडिशनर लावू… पाण्याची गुणवत्ता बिघडत चाललीय… जाऊ देत. आपण मिनरल वॉटरच्या बाटल्या घेऊ. घरात आरओ प्युरिफायर बसवून घेऊ. तंत्रज्ञानानं आपल्याला एवढं भरभरून द्यायला सुरुवात केलीय, की निसर्गदत्त देणग्या त्यापुढं आपल्याला फिक्या वाटायला लागल्यात. मुंबईसह काही शहरं येत्या तीस वर्षांत समुद्रात बुडायला सुरुवात होईल, असा एक अहवाल काही दिवसांपूर्वी आला होता. तेव्हाही “जेव्हा होईल तेव्हा पाहून घेऊ,’ असाच अलिप्त भाव सामान्यतः पाहायला मिळाला. आपल्या घरात आरओ प्युरीफायर आहे, प्रवासात पाण्याची बाटली विकत घेणं आपल्याला परवडतंय; सबब पाण्याची गुणवत्ता चांगली असण्याची आपल्याला बिलकुल गरज नाही, हे आपण मनाला बजावून टाकलंय. एसी घरातून एसी गाडीत बसायचं आणि एसी ऑफिसात जायचं, हाच ज्यांचा दिनक्रम आहे, त्यांना जागतिक तापमानवाढीशी किती देणंघेणं असणार! ज्यांच्याकडे निसर्गाचा मार झेलण्याची तंत्रज्ञाननिर्मित क्षमता नाही, अशांचा विचार करणं तर आपण पूर्वीच सोडून दिलंय. परंतु निसर्गानं असा भेदभाव करणं बंद केलंय, हेही तितकंच खरं!
केंद्राच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयानं सर्व राज्यांच्या राजधान्यांमधील पाण्याची गुणवत्ता नुकतीच तपासली. आपण नशीबवान ठरलो; कारण त्यातल्या त्यात स्वच्छ पाणी मुंबईचंच आहे, असं या सर्वेक्षणात दिसून आलं. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आहेत, हे आपलं भाग्य! परंतु राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मात्र पाण्याची गुणवत्ता सगळ्यात खराब असल्याचं दिसून आलंय. दिल्लीतलं पाणी पिण्यालायक नाही, असं दहा निकषांच्या आधारे या अहवालात म्हटलंय. या सर्वेक्षणात केवळ महानगरपालिकांकडून पाणीपुरवठा होणाऱ्या शहरांचा म्हणजेच मोठ्या शहरांचा समावेश आहे. पाण्यात आर्सेनिक घटकांच्या मिश्रणामुळे अनेक ठिकाणी पाणी पिण्यालायक राहिलेले नाही, असे हा अहवाल सांगतो. मोठ्या शहरांत, जिथं पाणीपुरवठा करण्यापूर्वी शुद्धीकरणाची मोठी यंत्रणा असते, तिथं ही अवस्था! कल्पना करून पाहा, जिथं पिण्याचं पाणी आणण्यासाठी बायाबापड्यांना चार-चार किलोमीटर पायपीट करावी लागते, तिथं काय परिस्थिती असेल! उन्हाळा सुरू होताच विहिरी तळ गाठू लागतात आणि अत्यंत धोकादायक स्थितीत विहिरीत उतरून मुली-बाळी जीव धोक्यात घालून पाणी भरतात. दुष्काळी भागात टॅंकर आला की संपूर्ण गाव धावत सुटतो. विहिरीत पडून, टॅंकरखाली सापडून लोकांनी जीव गमावल्याची उदाहरणं आहेत. यातून भविष्याबद्दल काही अंदाज येतोय?
आपण भीषण पाणीसमस्येच्या उंबरठ्याशी उभे आहोत, असं नीती आयोगानं गेल्या वर्षीच सांगितलं होतं. यंदा आपण महापूर पाहिला; पण निसर्गाचं दान फाटक्या झोळीत कसं मावणार? पाणी गेलं वाहून! दोन-तीन महिन्यांत पुन्हा टंचाई जाणवू लागेल. निसर्ग आपल्याला कधी गरजेपेक्षा जास्त तर कधी गरजेपेक्षा खूप कमी पाणी पाजतोय. मात्र, तरीही कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात या मुद्द्याला अग्रक्रम नाही. एकमेकांना पाणी पाजून वेळ उरला, तर विचार करणार ना!