वाहनचालकांची पाण्यातूनच कसरत : दुकानदारांवर कारवाई करणार
उरुळी कांचन – उरुळी कांचन येथील अष्टापूर रोड दत्तवाडीकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात दररोज पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रेल्वेच्या पुलाखाली ड्रेनेज लाईन टाकून हे पाणी ओढ्यात सोडण्यात यावे, अशी मागणी कोरेगाव मूळ, अष्टापूर, दत्तवाडी टिळेकरवाडी, खामगाव, भवरापूर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
उरुळी कांचन येथे रेल्वेवरून ब्रीज नसल्याने कोरेगाव मूळ, अष्टापूर, टिळेकरवाडी, खामगाव, भवरापूर, दत्तवाडी, बिवरी, नायगाव, पेठसह अन्य गावांतील चारचाकी वाहन तसेच दुचाकी वाहने या पुलाखालून जातात. या पुलाशिवाय पर्याय नसल्याने येथील दोन्ही पुलाखाली वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र, उरुळी कांचन गावात पाऊस पडल्यावर येथील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचते. तर काही बाजारपेठेतील अनेक दुकानदार घरमालक तसेच अनेकजण आपली वाहने रस्त्यावर धुतल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत येऊन ते रेल्वेच्या पुलाखाली जात आहे. यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
उरुळी कांचन येथील ग्राम विकास अधिकारी कैलास कोळी म्हणाले की, याठिकाणी लवकर ड्रेनेज लाईन करण्यात येईल. कारण पाऊस पडत आहे. मध्यतंरी कोबा केला होता. पण सध्या दररोज पाऊस पडत असल्याने याठिकाणी पाणी साचत आहे. लवकर तोडगा काढण्यात येईल. उपसरपंच सुनील दत्तात्रय कांचन म्हणाले की, दुकानदार रस्त्यावर गाडी धुतल्यावर तसेच दुकान धुतल्यावर जो कोणी पाणी सोडत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात
येणार आहे.