नवी दिल्ली – मुंबईसाठीच्या शहरी जलमार्ग वाहतूक प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडविय यांनी एक बैठक घेतली. मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मुंबई पोर्टचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र सागरी प्राधिकरणाचे अधिकारी तसेच इतर संबंधीत या बैठकीला उपस्थित होते.
मुंबई शहराच्या रस्त्यांवरील ओसंडून वाहणाऱ्या वाहतूकीचे ओझे कमी करण्यासाठी तसेच पर्यावरण स्नेही जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी रोपॅक्स फेरी सेवेचे चार नवे मार्ग तसेच वॉटर टॅक्सीचे बारा नवे मार्ग, डिसेंबर 2021 पर्यंत कार्यान्वित करण्याची योजना आहे.
सध्या भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) या व्यवस्थित सुरू असलेल्या रोपॅक्स सेवेमुळे रस्ते मार्गाने होणारा एकशे दहा किलोमीटरचा प्रवास जलमार्गाने 18 किलोमीटर एवढा कमी झाला आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांचा दररोजचा तीन ते चार तासाचा प्रवासाचा वेळही एक तासापर्यंत कमी झाला आहे. या फेरी सेवेचे प्रचंड फायदे बघता मुंबईतील विविध मार्गांवर अशाच प्रकारच्या सेवा कार्यान्वित करण्याची योजना आहे.
हे नवीन सुरू होणार असलेले रोपॅक्स फेरीचे 4 नवे मार्ग आणि वॉटर टॅक्सीचे 12 नवे मार्ग हे मुंबईतील दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. या मार्गामुळे प्रदूषणविरहित, शांत आणि प्रवासाच्या वेळेत बचत करणारा पर्याय उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे प्रवासाचा खर्च आणि कार्बन उत्सर्जनही लक्षणीयरित्या कमी होईल. मुंबई शहरातील वाढते पर्यटक आणि प्रवासी यांच्या प्रवासाच्या गरजा पुऱ्या करण्याच्या दृष्टीनेसुद्धा ही मोठी उपयुक्त बाब असेल.
नवीन जलमार्ग वाहतूक सुरू करण्याची योजना म्हणजे जलमार्गाचा यथासांग उपयोग करून त्यांना देशाच्या आर्थिक विकासात सहभागी करून घेणे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीच्या सहाय्याने टाकलेले नवीन पाऊल आहे, असे बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी यावेळी सांगितले. आता नवीन संधींची दारे उघडतील तसेच अशा रोपॅक्स व वॉटर टॅक्सी सेवांचे नवीन जाळे विविध सागरी राज्यांमध्ये उभारता येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.