पुणे – शहरात यंदा सरासरीपेक्षा जास्त झालेला पाऊस… तसेच जुलै अखेरीस शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे 100 टक्के भरली असली तरी, यंदा पावसाळ्यात शहरात पाण्याच्या टॅंकरची विक्रमी नोंद झाली आहे. त्यातच, लॉकडाऊनमुळे कुटुंबातील बहूतांश व्यक्ती घरीच असल्याने तसेच स्वच्छतेसाठी पाण्याची मागणी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी 19 हजारावर असलेली शहरातील टॅकरची मागणी यंदा सरासरी 23 हजारांवर गेली आहे.
महापालिकेकडून शहराला दरवर्षी सुमारे 17 ते 18 टीएमसी पाणीपुरवठा होतो. त्यांतर्गत काही भागांत दोन वेळ, तर काही भागांत एक वेळ पाणी दिले जात आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची अनियमितता असल्याने एक वेळच पाणी देण्यात येत होते. त्यामुळे 2015 पासून शहरात टॅंकरची मागणी वाढली आहे. हा टॅंकरचा आकडा सरासरी 19 ते 20 हजारांपर्यंत होता. मात्र, यंदा एप्रिलनंतर शहरात टॅंकरची विक्रमी मागणी नोंदविली गेली असल्याचे आकडेवारीतून समोर आले.
नगररस्ता, कोंढवा भागांत सर्वाधिक मागणी
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरात नगररस्ता आणि कोंढवा परिसरात टॅंकरची सर्वाधिक मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागाचा पाणीपुरवठा अनियमित असल्याने ही स्थिती उद्भवली असून दरवर्षी सर्वाधिक टॅंकर या भागात पुरविले जातात. त्यानंतर हडपसर, धायरी, शिवाजीनगर भागांतही टॅंकरची मोठी मागणी आहे.
भामा आसखेड प्रकल्प तारणार
महापालिकेकडून शहराच्या पूर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी भामा आसखेड योजना राबविण्यात येत आहे. यांतर्गत शहरासाठी सुमारे 2.62 टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. परिणामी, नगररस्ता परिसराची पाणी समस्या सुटणार असून सध्या त्या भागात दिले जाणारे पाणी महापालिकेस लष्कर पाणीपुरवठा अंतर्गत पाणी दिल्या जाणाऱ्या हडपसर, कोंढवा परिसरास देता येणार आहे. त्यामुळे ही योजना मार्गी लागल्यानंतर शहरातील टॅंकरची दरवर्षी वाढतच जाणारी मागणी कमी होण्याची चिन्हे आहेत.