मुंबई – जिल्ह्यासह राज्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून तापमानातही प्रचंड वाढ झाली आहे. दररोज पारा 40 अंशावर जात असल्याने अनेक ठिकाणचे जलसाठे कोरडे पडल्याने पाण्याचे दुर्भिक्ष वाढले आहे. अशातच टँकरची मागणी केलेल्या टंचाईग्रस्त गावांना दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, तसेच दुष्काळ निवारणासाठी जल संधारणाच्या कामांना गती द्यावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थानातून ऑडिओ ब्रिज सिस्टीमद्वारे जळगाव तसेच इतर काही जिह्यांतील सरपंचांशी मोबाईलवरून थेट संपर्क साधला. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा असे आदेश यावेळी प्रशासनाला दिले. माणसांसोबत गुरांनाही पाणी दिले जाईल. 2018ची लोकसंख्या व गावातीला जनावरांची संख्या लक्षात घेऊन टँकरचा पाणीपुरवठा वाढवण्यात यावा. आवश्यक त्या ठिकाणी गुरांना चारा व पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.