चिव्हेवाडीतील प्रकार : शासकीय पातळीवर कोणीही दाद देईना, चौकशीची मागणी
केतकावळे -पुरंदर तालुक्यातील स्वच्छता अभियानात राष्ट्रपतीपदक मिळालेल्या चिव्हेवाडी गावातील पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, सरपंच दीपक चिव्हे यांनी गावातील गटातटांमुळे हे आरोप केले जात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे या योजनेवरून गावातील राजकारण चांगलेच तापले आहे.
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला हे गाव आहे. याठिकाणी डोंगरी भाग असून महिलांना मैलभर अंतरावरून विहिरीतील पाणी आणावे लागते. चिव्हेवाडीला त्यांच्या आधीच्या काळात पाणीपुरवठ्यासाठी शेजारील देवडी गावच्या म्हसोबा बंधाऱ्याजवळील विहिरीतून केलेली पाणीपुरवठा योजना मार्च 2012 मध्ये ग्रामपंचायतीच्या ठरावातून योजनेस मान्यता दिली. परंतु ती योजना अपूर्ण असून त्यात भ्रष्टाचार झाल्याने या योजनेचा फायदा होत नाही. त्यामुळे या योजनेची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
चिव्हेवाडी बंधाऱ्यात जवळील पाणीपुरवठा विहिरीतून ग्रामस्थांना मार्चअखेरपर्यंत पाणीपुरवठा होतो. त्यानंतरच्या काळात पाणीटंचाई सुरू होते. पावसाळा होईपर्यंत ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीने 2012 मध्ये ठराव मंजूर करून गावठाण व वाड्या-वस्त्यांवर नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केली.
31 लाख रुपये खर्चाची योजना देवडी गावच्या उत्तरेस असलेल्या म्हसोबा तलावाच्या खालील बाजूस असलेल्या ओढ्याच्या किनारी भूजल खात्याने देवडी व चिव्हेवाडी गावाकरिता दिलेल्या दाखल्यानुसार 6.00 मीटर व्यासाचा बारा मीटर खोलीची नवीन विहीर पाणीपुरवठा योजनेमध्ये घेतली आहे. 9250 लिटर पाणी फेकण्याची क्षमता आहे.
141.90 मीटर दाबाच्या 10 अश्वशक्तीच्या सबमर्सिबल पाइपद्वारे 65 मिमी व्यासाच्या 750 दाबनलिकेने नवीन बैठी साठवण टाकी तीन हजार लिटर क्षमतेची आहे. यामधून गावाला दोन स्वतंत्र आउटलेट काढून गावात नवीन पाइपलाइनद्वारे घरगुती नळकनेक्शनमधून पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. त्यासाठी 31 लाख 22 हजार 63 रुपये इतक्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर करून योजना मंजूर केली.
परंतु त्यात आदर्श सरपंच दीपक धोंडीबा चिव्हे यांनी गैरव्यवहार करून अपूर्ण योजना पूर्ण असल्याचे सांगून पूर्णत्वाचा दाखला घेतला. परंतु गावातील नागरिक सत्यवान बोराणे व इतर ग्रामस्थ यांनी ही योजना अपूर्ण असून या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे “प्रभात’शी बोलताना सांगितले. ही पाणीपुरवठा योजना अपूर्ण आहे.
या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा व छोटे बंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना लक्ष द्यावे. असे नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. परंतु गैरव्यवहाराची चौकशी झाली नाही.
एकवेळा जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचा आदेश पंचायत समितीच्या बीडीओ यांना देऊनही त्याची चौकशी झाली नाही. ही चौकशी पुरंदरचे बीडीओ करीत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
चिव्हेवाडी ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मी स्वतः ग्रामसभा घेऊन नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचे समाधान केले. परंतु गावातील गटातटाच्या राजकारणांमुळे हे आरोप केले जात आहेत. त्यात कसलाही भ्रष्टाचार झाल्याचे दिसून आले नाही.
– आर. डी. गायकवाड, शाखा अभियंता,
पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग, पुरंदर.
देवडी गावच्या सरपंचांनी देवडी येथील विहिरीतून पाणी देण्यास नकार दिल्याने चिव्हेवाडी गावच्या जुन्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्याचे ठरले. जुने पाणीपट्टी बिल न भरल्याने देवडी गावच्या विहिरीतून पाणी न घेता तेथील पंप काढून चिव्हेवाडी गावच्या विहिरीत बसवला आहे. सध्या तेथील विहिरीतून गावास पाणीपुरवठा केला जात आहे. गावातील सरपंचपदाच्या निवडणुकील राजकारणामुळे हे आरोप होत आहेत. या आरोपात काहीही तथ्य नाही. मी कसल्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहे. याबाबत काही आढळून आले तर मी सरपंचपदाचा राजीनामा देईन.
– दीपक चिव्हे, सरपंच, चिव्हेवाडी.