वाई – गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून पारा 38 ते 40 अंशांवर जात आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे डोंगर परिसरातील जलसाठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पक्षांची तहान भागविण्यासाठी पसरणी रामप्रहर व भगवा कट्टा या ग्रुपच्यावतीने पसरणी घाटात पक्ष्यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
झाडांना भांडी बांधून त्यामध्ये पाणी तसेच खाण्यासाठी धान्यदेखील ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या 12 वर्षांपासून या ग्रुपच्या माध्यमातून हे उपक्रम राबविले जात आहे. सूर्यनारायण तळपू लागल्याने उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दुष्काळी पट्ट्यात न येणाऱ्या परिसरात ही पाण्याचे स्त्रोत आटले असून पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पाणी टंचाईचा सर्वाधिक परिणाम हा प्राणी, पक्ष्यांवर होत असतो.
पाण्यासाठी दाहीदिशा त्यांना वणवण फिरावे लागते. पाण्याच्या शोधात त्यांची शिकार होण्याची शक्यता जास्त असते. तरीही आपला जीव धोक्यात घालून पाण्यासाठी फिरावेच लागते. सध्या करोनामुळे लोकडाऊन असल्याने घाटातील रहदारी बंद झाल्याने पक्ष्यांना पाणी व खाद्य मिळत नाही. त्यामुळे या छोट्या जीवांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून पसरणी घाटात रामप्रहर व भगवा कट्टा ग्रुपच्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे, यामध्ये पसरणी घाटात अनेक ठिकाणी झाडांवर पक्षांसाठी पाण्याची भांडी बांधण्यात आली असून प्रशासनाकडून परवागणी घेवून दोन दिवसातून युवक पक्ष्यांना चारा व पाणी देणार आहेत.
सध्या ग्रुपच्या सदस्यांच्या माध्यमातून 45 झाडांवर पक्षांसाठी भांडी लावण्यात आली आहेत. हा उपक्रम बारा वर्षापासून अविरत चालू आहे. विविध लोकउपयोगी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रामप्रहर व भगवाकट्टा ग्रुपच्या सदस्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.