पाणीकपातीने नागरिकांचे हाल : अधिकारी-कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा रोष
आधिकारी त्रस्त : बदली करण्याची मागणी
पिंपरी – गेल्या तीन महिन्यांपासून शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी ही पाणीकपात करत असल्याचे आयुक्तांनी प्रथम सांगितले होते. पाणीपुरवठा विभागाला पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र दुरुस्ती व तांत्रिक बाबी सोडविण्यात व्यस्त आहेत.
मात्र तरीही सर्व भागामध्ये समान पाणीपुरवठा करण्यास पाणी पुरवठा विभागाला यश आले नाही. दरम्यान पाणी कपातीने नागरिकांचे हाल होत असताना लोकप्रतिनिधीही आपला राग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काढत आहेत. दिवसें-दिवस वाढत चाललेल्या रोषामुळे आता अधिकाऱ्यांवर “पाणी पुरवठा विभाग नको रे बाबा’, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
शहरात दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना ज्या दिवशी पाणी येते, त्या दिवशी काही तांत्रिक अडचण येऊन पुरेसे पाणी मिळाले नाही तर लोक लोकप्रतिनिधीकडे नाराजी व्यक्त करतात आणि लोकप्रतिनिधींचा राग अधिकाऱ्यांना सहन करावा लागतो. पाण्याची टंचाई भासल्याने चक्क वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच खोलीत कोंडण्याचा प्रकार यामुळे झाला. परिणामी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी संतापले असून आम्हाला पाणीपुरवठा विभागात काम करायचे नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी दुसऱ्या विभागात बदली करण्याची मागणी केली आहे.
थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
अधिकाऱ्यांना अपमानित करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अनेक नगरसेवक महासभेत अधिकाऱ्यांना धारेवर धरतात. तसेच अनेक वेळा काळे फासण्याची व खड्ड्यात टाकण्याची धमकी देतात. त्यामुळे अधिकारी त्रस्त झाले असून त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच प्रशासन विभागाकडे बदलीसंदर्भात अर्ज केला आहे. सत्ताधारी नगरसेविका आशा शेंडगे यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कासारवाडी येथील पाण्याच्या टाकीखालील खोलीत कोंडले होते. ही घटना 1 फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी संतप्त झाले. पुाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दिवसरात्र काम करूनही अशा प्रकारची वागणूक मिळत असल्याने पाणी पुरवठा विभागात आम्हाला कामच करायचे नाही असा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांची कुचंबणा
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विभागाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. अनधिकृत नळजोडांचे सर्वेक्षण करून त्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच पाणीगळती शोधून त्यामध्ये दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांना सम प्रमाणात पुरेसे पाणी कसे देता येईल यासाठी विभागाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. मात्र तरीही लोकप्रतिनिधी कडून हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. नगरसेवकांकडून कायदा हातात घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपमानित केले जाते. अनेक वेळा अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे, तोंडाला काळे फासणे किंवा हीन दर्जाची वागणूक देणे अशा घटना वारंवार घडत आहेत. बैठकांमध्येही अधिकाऱ्यांना अपशब्द वापरणे व अपमानित करणे हे नित्याचे झाले आहे. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुंचबणा होत आहे. तसेच याचा विपरीत परिणाम कामकाजावर होत आहे.
लोकप्रतिनिधीवर कारवाई न केल्याने आश्चर्य
वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोलीमध्ये कोंडूनही संबंधित लोकप्रतिनिधीवर काहीच कारवाई केली नाही. एरव्ही राष्ट्रवादी, मनसे, कॉंग्रेस या पक्षातील नगरसेवकांनी आंदोलन केल्यास त्यांच्याविरोधात आयुक्त श्रावण हर्डीकर गुन्हा दाखल करतात. मात्र सत्ताधारी पक्षातील नगरसेविका आशा शेंडगे यांच्यावर आयुक्तांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे महापालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अधिकाऱ्यांवर मानसिक दडपण
अधिकाऱ्यांना अपमानित केल्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण येतो. त्यामुळे अनेकदा बैठकांमध्ये बसण्याची इच्छा राहत नाही. तसेच एखादे काम करायचे असेल तरी त्याचे परिणाम चांगले होतील की वाईट याचा विचार करण्यातच वेळ जातो. त्यामुळे कामकाजावरही परिणाम होतो. अनेकवेळा चांगले निर्णय देखील या प्रकारांमुळे टाळावासे वाटतात. कारण त्या निर्णयावर लोकप्रतिनिधी कसे व्यक्त होतील याची भीती वाटते. त्यामुळे काम करण्यामध्ये मन लागत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.