पुणे – महापालिकेकडून तब्बल 2521 कोटी रुपये खर्चून शहरात 24 तास समान पाणी पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे या कामाबाबत नाराजी व्यक्त करत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या योजनेचे काम वेगाने पूर्ण होण्यासाठी हे काम महापालिकेच्या पथ आणि पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे देण्यात आले आहे. यासाठी 9 जणांची नियुक्ती करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश आयुक्त कुमार यांनी नुकतेच काढले आहेत.
शहरातील नागरिकांना समान पाणी देण्यासाठी तीन टप्प्यात पालिकेकडून ही योजना राबविण्यात येत असून 2017 पासून तिचे काम सुरू आहे. त्यात, शहरात 81 ठिकाणी नवीन टाक्या बांधणे, 1700 किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या बसविणे तसेच सव्वा तीन लाख पाणी मीटर बसविण्याच्या कामांचा समावेश आहे. त्यातील 80 टक्के टाक्यांचे काम मार्गी लागले असले तरी आणखी काही टाक्या भूसंपादना अभावी रखडलेल्या आहेत, तर जलवाहिनीचे काम ठिकठिकाणी मान्यता तसेच अडवणूकीमुळे संथगतीने सुरू असल्याने या योजनेच्या वेळेत पूर्ण होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, या योजनेचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी दोन आठवड्यांपूर्वी बैठक घेतली होती. त्यात, आयुक्तांनी योजनेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता महापालिकेचे भामा- आसखेड योजनेचे काम पाहणारी अभियंत्याची “टिम’ या योजनेसाठी नियुक्त करण्यात आली असून यामध्ये पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश कडू, उपअभियंता मनोज गाठे, विजय हवालदार, निवृत्ती उतळे, यांच्या सह, पथ विभागाचे राजेश भूतकर, उदय कोदे, आणि ड्रेनेज विभागाच्या राजेश खाडे, दिपक सोनवणे, सुहास महेंद्रकर या नऊ जणांचा समावेश आहे.