पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 7.81 टीएमसी इतका पाणीसाठा कमी आहे. सध्यःस्थितीत खडकवासला प्रकल्पात 14.83 टीएमसी म्हणजे 50 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. दरम्यान, प्रकल्पातील चार धरणांच्या परिसरात रविवारी हलक्या सरी पडल्या.
पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच शेतीसाठी खडकवासला धरणातून आवर्तन सोडण्यात येते. त्यामुळे ही चार धरणे कधी भरणार याकडे लक्ष लागलेले असते. जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या स्वरुपाचा पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यानंतर मात्र मागील 8 दिवसांपासून धरणांच्या परिसरात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात अल्पप्रमाणात वाढ होत आहे.
खडकवासला धरणात 1.57 टीएमसी, पानशेतमध्ये 5.95 टीएमसी, वरसगावमध्ये 5.81 टीएमसी आणि टेमघर धरणात 1.51 टीएमसी इतका पाणीसाठा जमा आहे. सध्या प्रकल्पात 50.88 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी प्रकल्पात 22.64 टीएमसी म्हणजे 77.68 टक्के इतका पाणीसाठा होता. यंदा मात्र मागील वर्षाच्या तुलनेत 7.81 टीएमसीने पाणीसाठा कमी आहे.