हतबल आयुक्तांची पत्रकार परिषदेत कबुली
पवना बंद पाईपलाईनबाबत स्पष्ट बोलणे टाळले
पिंपरी – पाणीपुरवठा विभागाचे अपयश झाकण्यासाठी समन्यायी पाणी वाटपाचे नाव देत शहरवासियांवर लादलेली पाणीकपात हे वर्ष संपेपर्यंत कायम राहणार असल्याची स्पष्ट कबुलीच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शहरासाठी अतिरिक्त 35 एमएलडी पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवला जाणार असून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असून डिसेंबरपर्यंत हा पाणीसाठा उपलब्ध होईल, असे आयुक्तांनी सांगितले. यामुळे पुढील वर्षभर शहरवासियांवरील पाणीकपात कायम राहणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.
राहणीमानयोग्य शहराचे सर्वेक्षण सुरू आहे. पाणी समस्येमुळे या सर्वेक्षणातील गुणांकन घसरण्याची भिती आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली. पाणीपुरवठ्याबाबत बोलताना आयुक्त म्हणाले, समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे काही प्रमाणात पाण्याची समस्या कमी झाली आहे. दररोज पाणीपुरवठा करणे सद्यस्थितीत शक्य नाही. सध्या रावेत बंधाऱ्यातून पूर्ण क्षमतेने पाणी उचलण्यात येत आहे.
सध्या उपलब्ध असलेल्या क्षमतेमध्ये वाढ करण्यावी आवश्यकता आहे. अतिरिक्त 100 एमएलडी पाणी उचलण्यासाठी क्षमता बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याबरोबर दररोज पाणीपुरवठा करत असताना आणखी किमान 30 ते 35 एमलएडी अतिरिक्त पाणीसाठा महापालिकेला उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यानंतरच शहराला दररोज पाणीपुरवठा करणे शक्य असल्याचे हर्डीकर म्हणाले.
पवना धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही शहरात विस्कळीत पाणीपुरवठा सुरू होता. दररोज पाण्याच्या तक्रारींचा भडीमार होऊ लागल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यावेळी दोन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. या दरम्यान, विविध उपाय योजना राबवून पाणीपुरवठा सुरळित करण्याची ग्वाही आयुक्त व पाणीपुरवठा विभागाने दिली होती. परंतु, ते दोन महिने संपल्यानंतरही दिवसाआड पाणीपुरवठा कायम आहे. त्यात सध्या सुरू असलेल्या राहण्यायोग्य शहराच्या सर्वेक्षणामध्ये महापालिकेसाठी दिवसाआड पाणीपुरवठा हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे शहराचे रॅंकिंग घसरण्याची शक्यता आहे.
अपयशाची आयुक्तांची कबुली
पाण्याची उपलब्धता व क्षमतेबाबत महापालिका आयुक्त व प्रशासन हतबल आहे. मात्र महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रृटीमुळे 40 टक्के म्हणजेच दैनंदिन सुमारे 200 एमएलडी पाण्याचा कुठलाही हिशोब नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील दोषांमुळे होणारी गळती आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी मागील चार वर्षांपासून महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र आजही बेहिशोबी पाणी वापर 40 टक्क्यांपेक्षा कमी करण्यात महापालिकेला यश आले नसल्याची कबुली आयुक्तांनी दिली.
…तर गुन्हा दाखल करा
पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोलीमध्ये कोंडण्याचा प्रकार नुकताच घडला होता. याबाबत पत्रकार परिषदेमध्ये मुद्दा उपस्थित केला असता आयुक्त म्हणाले, ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात येणार होते. मात्र तशी वेळ आली नाही. सर्व अधिकाऱ्यांच्या मागे प्रशासन ठामपणे उभे आहे. अधिकाऱ्यांना वारंवार अशा प्रकारांचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी गुन्हा दाखल करावा. त्यांच्या पाठीमागे प्रशासनाचा प्रमुख म्हणून उभे राहण्याची माझी जबाबदारी आहे. यासंदर्भात सर्व विभागप्रमुखांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे लोकप्रतिनिधी अथवा कोणीही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले तर गुन्हा नोंदवला जाईल, असा इशाराही आयुक्तांनी यावेळी दिला.
बंद पाईपलाईनवर बोलणे टाळले
शहरात सध्या पाण्याची टंचाई तीव्र असताना पालिका आंध्रा व भामा आसखेडवरून पाणी आणण्यासाठी कोट्यवधींच्या निविदा काढत आहे. मात्र महापालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या बंद पाईप लाईन योजनेबाबत संपूर्ण काम ठप्प आहे. राज्यातील सरकार बदलल्यामुळे प्रशासनाने या योजनेबाबत काही निर्णय घेता आहे का? असे विचारला असता शासनाकडे या योजनेवरील स्थगिती उठविण्याबाबत मागणी केल्याचे सांगत “काम सुरू आहे’ एवढेच बोलत आयुक्तांनी या विषयावर अधिक माहिती देण्याचे टाळले.