बामणवाडी व पवारवाडीला दिवसातून चार टॅंकर देण्याचे आमदारांकडून आश्वासन
अधिकाऱ्यांना दिल्या सक्त सूचना
पाऊस पूर्णपणे सुरू होईपर्यंत पाणी टंचाईग्रस्त गावांना टॅंकरने पाणीपुरवठा चालू ठेवावा. तसेच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशाही सक्त सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कराड – मागील महिन्यात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मतदार संघातील पाणी टंचाईग्रस्त गावांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृहात घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासमवेत तालुक्यातील संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर कितपत कामे सुरू झाली आहेत. टंचाईग्रस्त गावात टॅंकर सुरू झालेत की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या उद्देशाने आ. चव्हाण यांनी कराड दक्षिण मतदारसंघातील पाणी टंचाईग्रस्त गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. व तेथील ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
पाहणी दौऱ्याच्या प्रसंगी तहसीलदार अमरदीप वाकडे, पाणीपुरवठा अधिकारी आडके, सौ. पवार, सौ. पाटील आदी अधिकारी तसेच कॉंग्रेसचे कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, विंग गटाचे जिल्हा परिषद सदस्य शंकर खबाले, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंत जगताप, युवानेते इंद्रजित चव्हाण आदी प्रमुख मंडळी उपस्थित होती.
साळशिरंबे गावात सद्यस्थितीत दिवसातून एकदा गावास पाणी पुरवठा केला जातो. याच गावात गुलाबराव मोहिते यांच्या खासगी विंधन विहिरीतील पाणीपुरवठा विहिरीमध्ये सोडून पाणीपुरवठा केला जातो. विहिरीस आडवे बोअर घेण्याचे काम सुरू आहे. तसेच मनव या गावाला 24 हजार लिटर टॅंकरच्या तीन खेपा केल्या जातात. या गावात पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम सुरू करण्यात आले आहे. या वॉटर एटीएम सेंटरला आ. चव्हाण यांनी भेट देऊन गावकऱ्यांच्या या उपक्रमाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल कौतुक केले आहे.
वानरवाडी तलावाला 8 कोटी रुपये इतका भरघोस निधी आ. चव्हाण माध्यमातून उपलब्ध होऊ शकला. त्यातून तलाव खोलीकरण तसेच बंधाऱ्याच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम होणार आहे. वानरवाडी बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता वाढल्याने तारुख पंचक्रोशीला त्याचा फायदा होणार आहे. म्हणून स्थानिक असलेल्या सर्व पक्षांच्या आणि गटातटाच्या लोकांच्यात समाधान आहे. बामणवाडी गावाला सध्या टॅंकर चालू असून त्याचे पाणी पुरत नसल्याचे लोकांनी आ. चव्हाण निदर्शनास आणून दिल्यावर सोबत असलेल्या तहसीलदारांना त्यांनी सूचना करून पाऊस पडत नाही. तोपर्यंत एक टॅंकर वाढवून देण्यास सांगितले. आता बामणवाडी आणि पवारवाडीला दिवसाला चार टॅंकर पाणी देण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. भुरभुशी या गावाला एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातो. विहिरीचा गाळ काढणे व खोलीकरण करणे ही कामे सुरू आहेत. भुरभुशी अंतर्गत मुठ्ठलवाडी येथे 2 जून 2019 पासून टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे. भुरभुशी गावात एका ग्रामस्थाने स्वतःची बोअर गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. या गावकऱ्यांचे आ. चव्हाण यांनी अभिनंदन केले.