पाटण तालुक्यातील परिस्थिती; प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपा – 325 गावांना टंचाईच्या झळा
सूर्यकांत पाटणकर
पाटण – पाटण तालुक्यात उन्हाळ्याची तिव्रता झपाट्याने वाढत असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई काळात प्रशासन अजून झोपलेले दिसत आहे. उपाययोजना केवळ कागदावर होत असून प्रत्यक्षात मात्र जनतेला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
दुर्गम व डोंगराळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यात 325 गावे आहेत. त्यामधील सुमारे 53 गावे व वाड्या-वस्त्यांना पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने पाणी टंचाईसाठी आढावा बैठक घेतली जाते. परंतु संभाव्य पाणी टंचाईबाबत तातडीने उपाययोजना करण्याऐवजी केवळ कागदोपत्री उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासनाची धडपड चालू आहे.
मार्च, एप्रिल, मे असे तीन महिने पाणीटंचाई निर्माण होते. बहुतांश पाणीयोजना नैसर्गिक पाणी स्त्रोत्रांवर अवलंबून असल्याने उन्हाळा वाढत जाईल तसे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत्र कमी कमी होत जाते. परिणामी पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. यावर उपाययोजना करण्यासाठी जानेवारी महिन्यातच यासंबंधी उपाययोजना करणे गरजेचे असताना प्रशासन ऐन टंचाई काळातही झोपले आहे. तालुक्यातील या टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव पाठविण्यासाठी संबंधित गावांना कळविले आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये नळ योजनांची दुरुस्ती करणे, तात्पुरती पूरक नळयोजना घेणे, गावातील विंधन विहिरीची दुरुस्ती करणे, गाळ काढणे, खासगी विहिर अधिग्रहण करणे, टॅंकरने पाणी पुरवठा करणे यासाठी प्रस्ताव तसेच ठराव पाठविण्यासाठी प्रशासनाने ग्रामसेवकांच्या मागे तगादा लावला आहे. तहान लागली की विहीर खोदण्याचा असाच काहीसा प्रकार सुरू आहे.
संबंधित गावांचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत महसूल विभागाकडे पाठविले जातात. त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांकडे हे पाठवून मंजुरी देण्यात येते. प्रस्तावांची प्रक्रिया ही कीचकट असल्याने एक महिण्याचा कालावधी प्रस्ताव मंजुरीला लागतो या काळात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होते. परिणामी काही गावांमध्ये पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येते.
तालुक्यामध्ये डावरी व डावरी बौध्दवस्ती, सळवे कदमवस्ती, मान्याचीवाडी, येळवेवाडी, भोसगांव, आंब्रळकरवाडी, घाणबी, नरसोबाचीवाडी, गुढे, शिद्रकवाडी, काठणे, घाणव, धनगरवाडा, मस्करवाडी, आटोली, पांढरेपाणी, नारळवाडी, साबळेवाडी, मानेवस्ती, शेजवळवस्ती, मुरूड, गोरेवाडी, लोरेवाडी, सुतारवाडी, कुंभारगाव, मुळगाववस्ती, मोहितेवस्ती, पडवळवाडी, माटेकरवाडी, बामणवाडी, शिबेवाडी, जाधववडी, जंगलवाडी, उमरकांचन, मणदुरेपिटेवाडी, गोवारेदेवघर, बोडकेवाडी, जिंतीहौदाचीवाडी, गणेशवाडी, मोडकवाडी, गारवडे, झाकडे बौध्दवस्ती, टेळेवाडी, कालोळी, खालची बौध्दवस्ती, कसणी, घोट, फडतरवाडी, आंबेवाडी, जुगाईवाडी, पाबळवाडी, मणेरी तळिये, निवडे वरेकरवस्ती, केंजळवाडी, तारळे जंगलवाडी, पांढरवाडी, धनगरवाडी, काटेवाडी, असवलेवाडी, भिलारवाडी, नुने इ. गावांचा पाणीट ंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पंचायत समितीच्या टंचाई बैठकीत पाणीटंचाई बाबतीत वादळी चर्चा होते. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी शून्य टक्के होत आहे. पाणीटंचाई बाबतीत प्रत्येक सोमवारी ग्रामसेवकांनी प्रत्येक गावांचा आढावा पंचायत समितीच्या अधिकारी, पदाधिकारी यांना देण्याचा बैठकीत निर्णय झाला असताना तो निर्णय झाला असताना निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही.