कराड – कराड तालुक्यात अनेक गावात गेले पंधरा दिवस तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र अजूनही पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
संपूर्ण कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सध्या सर्व शाळांमध्ये परीक्षांचा हंगाम सुरू असतानाही अभ्यास सोडून पाणी आणण्यासाठी विद्यार्थी वर्गालाही भटकंती करावी लागत आहे. काही गावात पाच दिवसातून एकदाच पाणी येते तर काही गावात पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे अटले आहेत. दोन किलोमीटरवरून जिथे पाणी मिळेल तेथून आणावे लागत आहे. गतवर्षी तालुक्यातील सहा गावांमध्ये पाणीटंचाई असतानाही संपूर्ण उन्हाळा संपला तरी तिथे टॅंकरची व्यवस्था पाणी पुरवठा विभागाने केली नव्हती. जिल्हा परिषदेकडून मंजुरी आल्याशिवाय टॅंकर पाठवू शकत नाही, अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर्षी तरी पाण्यासाठी मंजुरीची वाट न बघता नागरिकांचे होत असलेले हाल लक्षात घेऊन लवकरात संबंधित गावांमध्ये टॅंकरची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.