आंबेगाव बुद्रुक – आंबेगाव बुद्रुक सर्वे नं.15, 16 येथे रस्ते, कचरा, वीज अशा मूलभूत सुविधेसह पाणीपुरवठा करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच या परिसरात पाणीटंचाई जाणवू लागली असून, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. सार्वजनिक नळाला पाणी येण्याची वेळच कायम नसल्याने पाणी मिळवण्यासाठी तासन् तास वाट पाहावी लागत आहे.
महानगरपालिकेचा कर व पाणीपट्टी भरूनही टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्यामुळे सर्व सामन्याचे बजेट कोलमडले आहे. यातून अशा सोसायट्यांवर आर्थिक बोजा पडत असल्याने महापालिका कर कशाचा घेते? असा सवाल नागरिक करीत आहेत.
आंबेगाव बुद्रुक सर्वे नं.15, 16 येथील पाणी प्रश्न गेल्या कित्यक वर्षांपासून कायम आहे. 2017 मध्ये महानगरपालिकेत समाविष्ट होऊन ही या भागात मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत. पुणे महानगरपालिका स्मार्ट सिटी चे स्वप्न पाहत असताना आंबेगावात पाण्याचा प्रश्नही सुटु शकलेला नाही, त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत मतपेटीतच दिसणार असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
मिळकतकर व पाणीपट्टी नागरिक वेळेत भरतात, तरीही महापालिका सुविधा देण्यात अपयशी ठरत असून पाण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पाण्याचा प्रश्न सुटत नाही. सर्वे नं.15, 16 मध्ये अनेक समस्या आहेत, त्या लवकर सोडवणे गरजेचे असताना याकडे कायमच दुर्लक्ष झालेले आहे. – अनिल कोंढरे, माजी उपसरपंच, आंबेगाव बुद्रुक