4 लाख नागरिकांना 223 टॅंकरने पाणीपुरवठा
सोलापूर (प्रतिधिनी) – सोलापूर जिल्ह्यात उन्हाच्या झळांनी एकीकडे नागरिक हैराण झाले असतानाच दुसरीकडे पाणीटंचाईने नागरिकांची झोप उडविली आहे. विहिरी, बोअर कोरडे पडल्याने पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. जनावरांच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकेकाळी सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईला सामोरे जाताना जिल्हा प्रशासनाने जवळपास 700 हुन अधिक टॅंकरने पाणीपुरवठा केला होता. यंदाच्या उन्हाळ्यात अशी परिस्थिती नसली तरीसुद्धा आजमितीला टॅंकरने द्विशतक गाठले आहे.
एप्रिलअखेर उन्हाच्या झळा तीव्र होत असताना टॅंकरच्या संख्येतही वाढ होत आहे.
टॅंकरच्या रोज 471 खेपा
उत्तर सोलापूर तालुक्यात 21, बार्शी तालुक्यात 14, दक्षिण सोलापूर तालुक्यात 49, अक्कलकोट तालुक्यात 22, माढा 38, करमाळा 80, मोहोळ 26, मंगळवेढा 88, सांगोला 104, तर माळशिरस तालुक्यात 27 खेपा केल्या जात असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
26 एप्रिलअखेर जिल्ह्यातील 198 गावे व 1305 वाडीवस्तीवरील 4 लाख 12 हजार 726 लोकसंख्येला टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मंगळवेढा तालुक्यात 45 गावांना 54, तर सांगोला तालुक्यातील 43 गावांना 48 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पंढरपूर तालुक्यात अद्याप एकही टॅंकरची मागणी आली नाही. उर्वरित तालुक्यातील टॅंकरची संख्या पाहता मे महिन्यात टॅंकरची संख्या तीनशेपर्यंत जाण्याची शक्यता आहे.