शेतकऱ्यांच्या पोटात गोळा, पेयजलाचा प्रश्न : दुष्काळी तालुके अजूनही कोरडेच
पुणे – जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मावळ, मुळशी, वेल्हा, जुन्नर, भोर या तालुक्यांमध्ये खूप दिवसानंतर सूर्यदर्शन झाले. मात्र, दुष्काळी भाग असलेल्या इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यात पावसाने अजून निम्मीही सरासरी ओलांडली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून, पेरणीची टक्केवारीही कमी आहे.
गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. मावळ, मुळशी, वेल्हा, भोर या तालुक्यात जोरदार पाऊस झाला असून, यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर जुन्नर, खेड या तालुक्यांतून चांगला पाऊस झाला.
दि.1 जून ते 17 ऑगस्टपर्यंत सर्वाधिक मावळ तालुक्यात
2 हजार 907 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, मुळशीमध्ये
2 हजार 569 मिमी, तर वेल्ह्यामध्ये 2, 511 आणि भोर तालुक्यात
1 हजार 780 मिमी पावसाची नोंद झाली. या चार तालुक्यांसह जुन्नर, खेड तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
पुढील काही दिवस खंड
नेहमीप्रमाणे इंदापूरमध्ये यावर्षी सर्वांत कमी पावसाची नोंद झाली असून, 1 जून ते 31 ऑक्टोबरमध्ये पावसाची सरासरी 421 मिमी आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 141 मिमी पाऊस झाला आहे. तर बारामती, दौंड तालुक्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला असून, केवळ 40 ते 60 टक्केच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला असून, या तालुक्यातील पेरण्याची टक्केवारीही कमी आहे. आता पावसाने उघडीप दिली असून, पुढील काही दिवस पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परतीचा पाऊस तरी या तालुक्यांवर कृपादृष्टी करणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.