खासदारांकडून गंभीर आरोप : आयुक्त अकार्यक्षम, अधिकारी झाले ठेकेदार, कामात भागीदार
पाणी गळतीचे प्रमाण 40 टक्के : शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न प्रचंड पेटला आहे. आता तर थेट शहराच्या खासदारांकडून आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर अतिशय गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर हे अकार्यक्षम असल्याचा आरोप केला आहे. तर अधिकारीच ठेकेदार झाले असून कामात भागीदार असल्याचे आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. खासदार बारणे यांनी शुक्रवारी आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर कित्येक प्रश्न उपस्थित करत पालिका प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही शहरवासियांना पुरेसे पाणी मिळत नाही. सोसायट्यांना पाणी अपुरे पडत असल्याने त्यांना टॅंकरने पाणी मागवावे लागत आहे. जर टॅंकरवाले पाणी पुरवू शकतात तर महापालिका का देऊ शकत नाही? शहराला पुरविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या तुलनेत गळतीचे प्रमाण तब्बल 40 टक्के इतके आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निष्क्रियतेमुळेच पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी दिला.
शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यासंदर्भात खासदार बारणे यांनी आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. तसेच, त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांच्या समवेत शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन भोसले, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, रेखा दर्शिले, चिंचवड महिला आघाडीच्या संघटिका अनिता तुतारे आदी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विहीर, बोअरवेल ताब्यात घेतले
बारणे म्हणाले, महापालिका शहरासाठी उचलत असलेल्या 520 एमएलडी एकूण पाण्यापैकी सुमारे 200 एमएलडी पाण्याची गळती होत आहे. महापालिकेने टॅंकर लॉबी बंद करायला हवी. शहराला पुरेसे आणि समान पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत महापालिकेने अल्प दरात टॅंकरने पाणीपुरवठा करावा. विहीर, बोअरवेल हे पाण्याचे स्त्रोत ताब्यात घ्यावेत. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात यावे. संपूर्ण शहराला समान पाणीपुरवठा करण्यात यावा. पाणी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात यावी.
टॅंकर लॉबी बंद करा
खासगी टॅंकरवाले कोठून पाणी उचलतात. ते पाणी शुद्ध की अशुद्ध असते. पाण्याचे नमुने तपासले जातात का? अशुद्ध पाण्यामुळे साथीचे रोग वाढत आहेत. शहराचे आरोग्य धोक्यात आणण्याचे काम महापालिका प्रशासन करत आहे. महापालिकेने तातडीने टॅंकर लॉबी बंद करावी, अशी मागणीही बारणे यांनी केली.
प्रशासनाचे प्रयत्न सुरू – आयुक्त
शहरात जाणवणाऱ्या पाणी प्रश्नाशी संबंधित काही बाबी या धोरणात्मक आहेत. काही विषयांबाबत कार्यवाही सुरू आहे. पाणी गळती कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू आहेत. त्यासाठी जलवाहिनी बदलणे व अन्य कामे सुरू असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले.
पाणीपुरवठ्याच्या निविदांची व्हावी चौकशी
महापालिका प्रशासन पाणी गळती, चोरी रोखू शकले नाही. पाणी चोरी शोधण्याचे काम कोणाचे आहे. शहरामध्ये अनधिकृत नळजोड एका दिवसात झालेले नाहीत. ते रोखण्याचे काम महापालिका प्रशासनाचे होते. मात्र, त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले. पाणीपुरवठ्याच्या आजपर्यंत काढण्यात आलेल्या निविदांची चौकशी करण्यात यायला हवी. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. शहरातील पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने आजपर्यंत कोट्यवधी रूपये खर्च केले. जेएनएनयूआरएम, अमृत योजनेअंतर्गत सातत्याने पाण्याचे मीटर बदलले. परंतु, पाणीगळती रोखण्यात अपयश आले. ठेकेदार पोसण्यासाठीच हे केले जात आहे का? याचा संशय येत आहे. आता अधिकारी ठेकेदार झाले आहेत. अनेक कामांमध्ये त्यांची भागीदारी आहे, असा आरोपही खासदार श्रीरंग बारणे यांनी केला.