नागरिकांना मिळणार लवकरच चास कमानचे पाणी
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – राजगुरूनगर नवीन पाणी योजनेच्या पाइपलाइन खोदाईचे काम वाडा रस्त्यावर सुरू असून रस्त्यावरील अधिक वर्दळ लक्षात घेता लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. मात्र, गेली अनेक वर्षांपासून पाणी मिळावे यासाठी नागरिक मागणी करीत होते. हे काम मार्गी लागणार असल्याने या कामाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
राजगुरूनगर शहरात नव्याने पाणीपुरवठा योजना करण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा त्यासाठी सुमारे 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेतील बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. मुख्य जलवाहिनी तसेच पाच लाख लिटर क्षमतेच्या नवीन टाक्या ही कामे पूर्ण झाली आहेत. राजगुरूनगर शहरांतर्गत लाईन खोदुन पाइप गाडण्याचे काम सध्या सुरू आहे. विशेषकरून मोठी वर्दळ असलेल्या वाडा रस्त्यावर काम हे काम आठवडाभरापासून सुरू झाले आहे. या कामामुळे काही जोड रस्त्यावर अडचणी निर्माण होत आहेत. या कामामुळे पूर्वीची नळ योजनेची पाइपलाइन फुटुन अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी येत आहे. बंदिस्त गटारेसुद्धा रस्त्यावरून वाहात आहेत. या परिसरात वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे.
महात्मा गांधी विद्यालयाजवळ थोडा राडा झाल्याने पादचारी व दुचाकीस्वरांना त्रासदायक झाले. मात्र, शनिवारी (दि. 16) हे काम पूर्ण झाल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे. याबाबत नगराध्यक्ष शिवाजी मांदळे म्हणाले की, राजगुरूनगर हे तालुक्याचे गाव आहे. शहरात लाखावर नागरिक वास्तव्य करतात. पाणी समस्या सोडवण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केल्यावर महत्त्वाकांक्षी योजना होत आहे. थेट चासकमान धरणातून पाणी उपसा होऊन पाणीपुरवठा होणार आहे. काम झाल्यावर नागरिकांना मुबलक प्रमाणात आणि स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे. काम होईपर्यंत नागरिकांची गैरसोय होणार आहे. मात्र, त्यासाठी नगरपरिषदेला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मांदळे यांनी केले.