पाणी काटकसरीने वापरा : पाटबंधारे विभाग
महापालिकेस फेरनियोजन करणे आवश्यकच
पुणे – मागील वर्षी पुणे शहरात जवळपास 6 महिने विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे डिसेंबरअखेर धरणसाखळी तुडुंब होती. मात्र, पुढील सात महिन्यांतच शहरावर पुन्हा पाणीसंकट ओढावले आहे. आता “चांगला पाऊस होईपर्यंत पाणी काटकसरीने वापरावे,’ असे पत्र पाटबंधारे विभागाने महापालिकेस दिले आहे. त्यामुळे पावसाने आणखी ओढ दिल्यास शहरावर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची भीती आहे. खडकवासला धरणसाखळीत सध्या 9 टीएमसी पाणीसाठा आहे.
खडकवासला धरणसाखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. या धरणांच्या उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता 29.50 टीएमसी असून त्यातील 11.50 टक्के पाणी शहरास पिण्यासाठी मंजूर आहे.
दरवर्षी या चारही धरणांमध्ये सुमारे दि.15 ते 20 जुलैदरम्यान वर्षभराचा पाणीसाठा तयार होतो. मात्र, यंदा ऑगस्ट उजाडला, तरी या धरणांमध्ये अवघा 33 टक्केच पाणीसाठा आहे. परिणामी, पावसाने ओढ दिल्यास अथवा धरणात पुरेसा पाणीसाठा न झाल्यास पुढील काही महिन्यांत पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन “महापालिकेने पाणी काटकसरीने वापरावे,’ असे पत्र पाठबंधारे विभागाने नुकतेच दिले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कोट्याचे पाणी कमी करण्याचे संकेत या पत्राद्वारे देण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेस मिळणाऱ्या पाण्याचे फेर नियोजन करावे लागणार आहे.
मागील वर्षी विक्रमी पाऊस
मागील वर्षी शहरात गेल्या 30 वर्षांतील विक्रमी पाऊस झाला. पावसाचा हा मुक्काम 6 महिने होता. महापालिकेच्या पर्यावरण अहवालातील माहितीनुसार या सहा महिन्यांत तब्बल 1441 मिमी पावसाची नोंद झाली. त्यात, जून-198, जुलै-376,ऑगस्ट-208, सप्टेंबर-287, ऑक्टोबर-235 तर नोव्हेंबरमध्ये 103 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे जानेवारी 2020च्या सुरुवातीपर्यंत या धरणांमध्ये 100 टक्के पाणी होते. मात्र, यंदा उन्हाळ्यात लॉकडाऊनमुळे बहुतांशी पुणेकर घरातच असल्याने पाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे धरणांतील साठाही कमी झाला आहे.