नेवासा – मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने नदीपात्रातील डिग्रस, मानोरी, मांजरी व तिळापूर या चार बंधाऱ्यांत 432 दलघफू पाणी सोडविण्यात आले असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे मुळा नदीपात्रातील बंधारे पाण्याने भरून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार ना. पाटील यांच्या आदेशाने मुळा धरणातून पाणी सोडण्यात आले होते.
मुळा नदीपात्रातील चारही बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाचे दहा दरवाजे बंद करण्यात आले. डिग्रस, मानोरी, मांजरी व तिळापूर हे चार बंधारे पाण्याने भरण्यात आले. त्यात 432 दलघफू पाणी सोडण्यात आले. 26 हजार दलघफू पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या 18 हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यांतून उन्हाळी अवर्तन सुरू आहे.
बंधारे भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिण्याचे पाणी, पिकांचे भरणे तसेच चाऱ्या प्रश्न मार्गी लागणार आहे. नदीकाठावर आसणाऱ्या कूपनलिका व विहिरींची पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. बंधारे भरून घेतल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.