ग्रामस्थांमधून संताप व्यक्त ः 25 लाख रुपये खर्च पाण्यात गेल्याची भावना
मंचर -अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेली नवीन पाण्याच्या टाकीला गळती लागली आहे. नवीन टाकीतूनच पाणी गळती होत असल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. टाकी बांधण्यासाठी झालेला 25 लाख रुपये खर्च पाण्यात गेल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
एक वर्षापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून 25 लाख रुपये मंजूर होऊन नवीन पाण्याची टाकी बांधण्यात आली.नवीन पाण्याच्या टाकीत पाणी सोडल्यानंतर पाण्याच्या टाकीतून पाण्याची गळती चालू झाली.
जुन्या पाण्याच्या टाकीतून नवीन पाण्याच्या टाकीत अद्याप पाईप जोडले गेले नाहीत. संबंधित ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. यापुढील काळात गावातील कोणतेच काम गावातील संबधित ठेकेदारांना देऊ नये, अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करणार असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. गेल्या काही वर्षात नळपाणीपुरवठा योजनेसाठी दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च होऊन गावाला आजही दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
संबंधित ठेकेदार, सब ठेकेदार अधिकाऱ्यांवर दबाव आणून रक्कम काढून घेत असल्याची गावात चर्चा आहे. अवसरी गावाला 14 व्या वित्त आयोगातून दरवर्षी 25 ते 30 लाख रुपयांचा निधी येतो. पण तो कोठे जातो व कोणती कामे झाली आहेत. याचा उलगडा मात्र ग्रामस्थांना होत नाही.कागदोपत्री कामे दाखवली असली तरी झालेल्या कामांचा दर्जा चांगला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यासाठी अवसरी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.