जेवणाच्या ताटातून कांदा गायब
कुजलेला, आकाराने छोटा कांदा विकत घेण्याची वेळ
स्वयंपाकघरात अघोषित चातुर्मास सुरू
शेतकरी आणि व्यापाऱ्यांची साठेबाजीला सुरुवात
जेवणाच्या ताटातून कांदा गायब
पुणे – कांद्याने अक्षरश: शेकड्याचा भाव मिळवला आणि त्यामुळे केवळ गृहिणीच नव्हे तर, हॉटेलचालक, छोटे खाद्यपदार्थ विक्रेते, भेळवाले यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. कांद्याच्या दराचा वांदा झाल्याने स्वयंपाकघरात गृहिणींनी अघोषित चातुर्मासच सुरू केला आहे.
स्वयंपाकातून आणि विकत मिळणाऱ्या या पदार्थातून कांदा गायबच झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पावसामुळे कांदा कुजून गेला आणि पर्यायाने उत्पादन कमी झाले. त्यामुळे उरल्या सुरल्या कांद्याला अक्षरश: शेकड्यांनी भाव मिळाला आहे. कांद्याची आवक कमी झाल्याने भाव वधारले आणि त्याने डोळ्यात पाणीच आणले. ही परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी साठेबाजीला सुरुवात केली. घाऊक बाजारातच कांद्याने शेकडा गाठला आणि किरकोळ बाजारात तो किलोमागे दीडशे ते 160 रुपये झाला आहे.
एरव्ही कुजलेल्या किंवा छोट्या आकाराच्या कांद्याकडे ढुंकूनही न पाहणारी गृहिणी त्यातल्या त्यात तोच कांदा घेताना दिसत आहे. तर हॉटेल व्यावसायिकांनी ताटात कांदा देणेच बंद केले आहे. याशिवाय भेळवाले आणि अन्य पदार्थ विक्रेत्यांच्या पदार्थात कांदा केवळ नावालाच दिसून येत आहे.
अनेक शेतकऱ्यांनी आता कांद्याची लागवड केली आहे. मात्र ते पीक वाढून उत्पादन बाजारात येईपर्यंत एक महिन्याचा कालावधी जाणार आहे. तोपर्यंत कांद्याचा भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इजिप्तमधून केंद्राने कांद्याची आयात केली आहे. मात्र तो कांदा येईपर्यंत ग्राहकांना दीडशे रुपये किलोमागे मोजावेच लागणार आहेत, हे निश्चित आहे.