पुणे – चाकण नगरपरिषदेला पाणी पुरवठ्यासाठी भामा-आसखेड प्रकल्पातून 2.1816 दलघमी इतके पाणी उचलण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे चाकण शहराचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. शासनाने 2031 ची लोकसंख्या विचारात घेऊन हा पाण्याचा कोटा मंजूर केला आहे.
2014 च्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायती, नगरपालिका या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने त्यांच्याकडून पिण्याचा पाणी आरक्षणापोटी सिंचन पुन:स्थापना खर्च घेण्यात येऊ नये, त्यामुळे सिंचन पुन:स्थापना खर्च माफ करण्यात आले आहे. पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिनियमातील तरतुदीनुसार सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन पाटबंधारे महामंडळाकडे वर्ग करणे व पाणीपट्टीची रक्कम प्रकल्पांच्या सिंचन व्यवस्थापनाच्या कामासाठी खर्च करण्यास मान्यताही शासनाने दिली आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत.