पिंपरी – गुरुवारी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असे महापालिकेने सांगितले होते. परंतु शुक्रवारी देखील शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठाच न झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. याबाबत विचारले असता कळाले की पुढील आठवडाभर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीतच राहणार आहे.
प्रशासकीय राजवटीत पाणी पुरवठा विभागाच्या तकलादू आणि ढिसाळ नियोजनाचा शहरवासियांना जबर फटका बसला आहे. शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या लाइनची दुरूस्ती, रावेत येथील जलउपसा केंद्र आणि निगडीतील जल शुध्दीकरण केंद्रातील दुरूस्तीची कामे 18 तास सुरू होती. त्यामुळे शुक्रवारी शहरातील सर्वच भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. तसेच शहरात आठवडाभर पाणी पुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने गुरूवार (दि.23) शटडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे गुरूवारी दिवसभर पाणीपुरवठा होणार नव्हता. तर शुक्रवार (दि.24) रोजी सकाळी अपुरा पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याचे पालिकेने नागरिकांना कळविले होते. या शटडाऊनच्या कालावधीत रावेत येथील उपसा केंद्र आणि निगडीतील शुध्दीकरण केंद्रातील विविध कामे करण्यात आली. त्याचबरोबर थेरगाव, चऱ्होली फाटा, थरमॅक्स चौक, बालाजीनगर, भोसरी, चिंचवड या भागातील पाणी पुरवठा लाईवरही विविध कामे करण्यात आली. त्यामुळे तब्बल 18 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.
शहराला 510 एमएलडी इतके पाणी दररोज पुरविले जाते. मात्र, शटडाऊनमुळे 350 एमएलडी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. फक्त 160 एमएलडी संपूर्ण शहराला पाणी सोडण्यात आले. शुक्रवारी दुपारी शहरातील काही भागात पाणी पुरवठा सुरू झाला असला तरी तो कमी दाबाने सुरू झाला होता. पाणी पुरवठा बंद असल्यामुळे पाणी सोडल्यानंतर पाइपमध्ये हवा पकडत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत झालाच नाही. प्रत्येक तासा-तासाला हवा काढून पाणी सोडण्यात येत होते. शहरातील विविध भागात पाण्याची मोठी ओरड निर्माण झाली.
दरम्यान, शहरातील काही भागात एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा केला जातो. मात्र, एमआयडीसीचे कोणतेही शटडाऊन नसताना त्यांचाही पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे नागरिकांच्या मनस्तापात आणखीनच भर पडली आहे.
अधिकाऱ्यांना पुढाऱ्यांचे फोन
विविध कामांमुळे शहरातील सर्वच भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. विविध भागातील नागरिकांनी स्थानिक माजी नगरसेवकांकडे पाणीच नसल्याबाबत धाव घेतली. त्यामुळे राजकीय पुढारी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांचा शुक्रवारी दिवसभर फोन सतत खणखणत होता. तर काही माजी नगरसेवकांनी महापालिकेत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली.
रावेत येथील जल उपसा केंद्र, निगडीतील जल शुध्दीकरण केंद्रासह शहरातील विविध भागात पाणी पुरवठा लाइनचे 18 तास काम सुरू होते. त्यामुळे शहरातील सर्वच भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पाण्याच्या टाक्या जोपर्यंत पूर्ण क्षमतेने भरत नाहीत तोपर्यंत पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. आठवडाभर पाणी पुरवठा विस्कळीत राहू शकतो. नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे.
– रामनाथ टकले, कार्यकारी अभियंता,
पाणी पुरवठा विभाग