पुणे – पाण्याच्या वादावर महापालिका आणि पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर तोडगा काढावा. त्यामुळे पुणेकरांवर पाणीकपात ओढावणार नाही याची दक्षताही घ्यावी, असा सूचनावजा आदेश खासदार गिरीश बापट यांनी गुरुवारी महापालिका प्रशासनास दिला.
शहराच्या पाण्यासह भामा-आसखेड योजना, चांदणी चौक, समान पाणी योजना, आमदार निधीची विकासकामे, खासदार निधीतील कामांसह महापालिकेच्या प्रलंबित कामाचा आढावा खासदार बापट यांनी महापालिकेत घेतला. महापालिकेचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी आणि नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
यावेळी मेट्रो प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना, चांदणी चौकातील उड्डाणपूल, नदीसुधार योजना (जायका) नदीकाठ संवर्धन व विकसन (रिव्हर फ्रंट डेव्हल्पमेंट) या प्रकल्पांची अंमलबजावणी, भूसंपादन आणि त्यातील अडचणींबाबत बापट यांनी चर्चा केली.
विशेषत: काही प्रकल्पांच्या रखडलेल्या भूसंपादनाबाबत लवकर निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास केल्या. या योजनांच्या आढाव्याचे सादरीकरण यावेळी महापालिकेच्या प्रभारी आयुक्त रूबल अग्रवाल यांनी यावेळी केले. महापालिकेचे विभाग प्रमुखयावेळी उपस्थित होते.