आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; आता तरी दररोज पाणी मिळणार का?
पिंपरी – शहरात समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच गळती रोखून विविध कामे करण्यासाठी साठ दिवसांकरिता एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची उद्या (दि.25) मुदत संपुष्टात येत आहे. ही मुदत संपल्यानंतर आयुक्त शहरात पाणी कपात कायम ठेवणार की रोज पाणीपुरवठ्याचे आदेश देणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
प्रचंड पाऊस झाल्यानंतर तसेच शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण सलग तीन वेळा शंभर टक्के भरल्यानंतरही शहरवासियांवर पाणीकपात लादण्यात आली होती. ऐन पावसाळ्यात शहरातील अनियमित पाणीपुरवठा, मोठ्या प्रमाणात होणारी पाणीगळती आणि टॅंकर माफियांकडून होणारी लूट यामुळे शहरवासियांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. धरणात पाणी असूनही नागरिकांना पाणी मिळत नव्हते. पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. शहराच्या अनेक भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनाअभावी शहरवासियांना पाणी कपातीचा सामना करावा लागला.
पाणीपुरवठा विभागाकडून योग्य नियोजन करण्यासाठी तसेच समन्याची पद्धतीने पाणी पुरवठा व्हावा, असे कारण देत आयुक्तांनी साठ दिवसांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार महापालिकेने 25 नोव्हेंबर 2019 पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. पालिकेच्या या निर्णयावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. पाण्याची टंचाई नसून समन्यायी पाणी वाटपासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. दोन महिन्यांसाठीच एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्याचे प्रशासनाने सांगितले होते. दरम्यानच्या काळात शहरातील पाणीपुवठा करणाऱ्या यंत्रणेमध्ये दुरुस्ती केली जाणार होती. तसेच अनधिकृत नळजोड, मोटारी जप्त करुन सुसूत्रता आणणार असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला होता.
साठ दिवसांची मुदत 25 जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे. धरणात जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा मुबलक पाणीसाठा आहे. एकदिवसाआड पाणीपुरवठा केल्यानंतरही केवळ जलशुद्धीकरण केंद्रापासून जवळ असलेल्या भागांमध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होतो. तर केंद्रापासून लांब असलेल्या भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तसेच अनेक नागरिकांकडे साठवण क्षमता नाही. त्यामुळे एक दिवसाआड पाणी येत असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एक दिवसाआड पाणीकपातीची दोन महिन्याची मुदत आज संपत असून पाणी कपात मागे घेऊन दररोज पाणीपुरवठा केला जाणार का याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
पवना धरणात 87.41 टक्के पाणीसाठा
पवना धरणात आजमितीला 87.41 टक्के पाणीसाठा आहे. 20 जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात धरणात 68.58 टक्के पाणीसाठा होता. त्यातुलनेत यंदा तब्बल 19 टक्के जादा पाणीसाठा धरणात आहे. हा पाणीसाठा मुबलक असून 20 जुलै 2020 पर्यंत पुरेल पाणी पुरेल असा अंदाज पवना धरणाचे शाखा अभियंता ए.एम. गडवाल यांनी वर्तविला आहे.
तक्रारी कमी झाल्याचा प्रशासनाचा दावा
एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु असल्याने पाणी टंचाईच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाल्याचा दावा प्रशासन करत आहे. शहरात समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा होत असल्याचा जावई शोधही पाणीपुरवठा विभागाने लावला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाची एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचीच भूमिका असल्याचे समोर येत आहे. शहरात पाणीटंचाई कायम असताना पाणीपुरवठा विभागाच्या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
सत्ताधाऱ्यांकडून आंदोलने बेदखल
शहरात पाणी कपात सुरु झाल्यानंतर नागरिकांसह विविध राजकीय पक्षांच्या वतीने टाहो फोडण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. तर मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले होते. अनेक हौसिंग सोसायटींनीही आंदोलने केली. मात्र महापालिकेमध्ये सत्ता असलेले भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र ही आंदोलने बेदखल केली.
साठ दिवसांसाठी करण्यात आलेली पाणी कपातीची मुदत उद्या संपुष्टात येत असतानाही महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या एकाही पदाधिकाऱ्याने पाणी कपात बंद करण्याबाबत कोणतेच वक्तव्य केलेले नाही. यापूर्वीही प्रशासनाचीच तळी सत्ताधाऱ्यांनी उचलली होती. आता मुदत संपल्यावर तरी शहरवासियांवर लादलेली पाणीकपात मागे घेण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी आयुक्तांवर दबाव वाढविणार की पुन्हा प्रशासनाला पाठीशी घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आताची भूमिकाही गुलदस्त्यात
साठ दिवसांसाठी करण्यात आलेली पाणी कपातीची मुदत उद्या संपुष्टात येत असतानाही महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या एकाही पदाधिकाऱ्याने पाणी कपात बंद करण्याबाबत कोणतेच वक्तव्य केलेले नाही. यापूर्वीही प्रशासनाचीच तळी सत्ताधाऱ्यांनी उचलली होती. आता मुदत संपल्यावर तरी शहरवासियांवर लादलेली पाणीकपात मागे घेण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी आयुक्तांवर दबाव वाढविणार की पुन्हा प्रशासनाला पाठीशी घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन महिन्यांसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्याने तक्रारींचे प्रमाण कमी झाले. नागरिकांना जादा दाबाने पाणी दिले जात आहे. दोन महिन्याची मुदत शनिवारी संपत आहे. याबाबत आयुक्तांसोबत बैठक होईल. दोन महिन्यांतील आढावा घेतला जाईल. किती तक्रारी आल्या, कोणत्या भागातून आल्या याची सविस्तर माहिती आयुक्तांना दिली जाईल. त्यानंतर एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवायचा की दररोज पाणीपुरवठा करायचा याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
– मकरंद निकम, सहशहर अभियंता, पाणपुरवठा विभाग