मनपा आयुक्तांची माहिती : गरज भासल्यास दिवसाआड “पाणी पुरवठा’
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सर्व भागामध्ये सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणी कपात कायम ठेवावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर गरज भासल्यास कपात वाढवून दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागेल, असे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. शहरासाठी सध्या दररोज 35 दशलक्ष लिटर इतके पाणी तुटीसहित कमी पडत आहे. त्यामुळे गरज भासल्यास दिवसाआडही पाणीपुरवठा करावा लागेल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे पवना धरण शंभर टक्के भरले असतानाही शहरवासियांवर पाणी कपातीचे संकट कायम राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पवना धरण गेल्या वर्षी 9 ऑगस्टला 100 टक्के भरले होते. तर, यंदा 3 ऑगस्टलाच धरण 100 टक्के भरले. गेल्या दशकातील सर्वाधिक पाणी साठा यंदा धरणात आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 11 तारेखला देखील धरण शंभर टक्के भरलेले आहे, तरी प्रशासन पाणी कपात रद्द करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. शहरात सध्या आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्यात आले आहे. शहराला दररोज 480 दशलक्ष लिटर इतके पाणी पुरविले जात आहे. सध्या आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवल्याने समान पाणी वाटपासाठी त्याचा फायदा होत असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरामध्ये काही भागात कमी दाबाने, अपुरा आणि विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. सोसायट्यांना तर भर पावसाळ्यातही टॅंकरने पाणी मागवावे लागले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे टॅंकरलॉबीचे मात्र चांगलेच फावले.
तेवढी क्षमता नाही!
आयुक्त हर्डीकर म्हणाले की शहरासाठी पाणीपुरवठ्याचे वितरण करण्यात सध्या अडचणी जाणवत आहेत. शहरासाठी दररोज 480 दशलक्ष लिटर इतके पाणी पालिका पवना धरणातून उचलत आहे. एमआयडीसीकडून दररोज 30 एमएलडी पाणी दिले जात आहे. महापालिकेच्या 515 दशलक्ष लिटरपर्यंत पाणी उचलण्याची आणि प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. त्यापुढील पाण्यावर आपण प्रक्रिया करू शकणार नाही. शहरातील सर्व नागरिकांना पाणी द्यायचे असल्यास दररोज 540 दशलक्ष लिटर इतके पाणी लागणार आहे. त्यासाठी पाण्याचे उपलब्ध स्त्रोत वाढविणे हाच एकमेव पर्याय आहे.
विहिरी व कूपनलिकांबाबत ठरवावे लागेल धोरण
शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना पाणी टंचाईची सर्वाधिक झळ बसत आहे. त्यांना भर पावसाळ्यातही टॅंकरने पाणी मागवावे लागले आणि अजूनही टॅंकरच त्यांची गरज भागवत आहे. शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना अवास्तव दराने पाणी विकून संबंधित टॅंकरमाफियांकडून सोसायटीधारकांची लूट सुरू आहे. विहिरी व कूपनलिका जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अधिग्रहण करण्याची मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेली आहे. तसेच, शहरात एकाही नवीन गृहप्रकल्पाला परवानगी देऊ नये. अनधिकृत नळजोडांबाबत फौजदारी कारवाई करावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती.
याबाबत महापालिका प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना हर्डीकर म्हणाले की, शहरातील विहिरी व कुपनलिकांचे सर्वेक्षण करावे लागेल. त्याबाबतचे निर्देश दिले आहेत. संबंधित विहिरी व कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यासाठी प्रथम महापालिका प्रशासनाला धोरण ठरवावे लागेल. त्यांनतर याबाबत कार्यवाही करता येईल. शहरात नवीन गृहप्रकल्पांना परवानगी न देण्याचा मुद्दा ही धोरणात्मक बाब आहे. त्याबाबत धोरण ठरल्यास कार्यवाही करता येईल. अनधिकृत नळजोडांना नियमित करण्याचा ठराव यापूर्वी सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 15 ते 16 हजार नळजोड अधिकृत केले आहेत.
चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी प्रतीक्षा
शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे. 40 टक्के आणि 60 टक्के भागासाठी दोन स्वतंत्र योजनांची कामे सुरू आहेत. समान पाणी वाटपासाठी या योजना महत्त्वाच्या आहेत. आंद्रा व भामा आसखेड धरणातून शहरासाठी पाणी उचलण्यास सुरवात झाल्यानंतरच शहराला चोवीस तास पाणी देणे शक्य होणार आहे, अशी कबुली आयुक्त हर्डीकर यांनी दिली.
धरणात पुढील सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा
साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत पवना धरण भरते आणि 10 ऑक्टोबरपर्यंत धरणात 100 टक्के पाणीसाठा असल्याची नोंद पहायला मिळते. मात्र यंदा 11 नोव्हेंबर पर्यंत धरणात पाणीसाठा 100 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15 टक्के पाणीसाठा जादा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला 85.45 टक्के इतका पाणीसाठा होता. गेल्यावर्षी तीन हजार 343 मिमी पाऊस झाला होता. तर यंदाच्यावर्षी चार हजार 30 मिमी इतका पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 687 मि.मि. जादा पाऊस झाला आहे. पिंपरी चिंचवडसह इतर छोट्या शहरांच्या पाणी पुरवठा योजनांकरिता दर महिन्याला धरणातून दहा टक्के पाणी वापरावे लागते. त्यानुसार आजचा पाणीसाठा हा पुढील वर्षी 10 सप्टेंबर 2020 पर्यंत नक्कीच पुरणार आहे, अशी माहिती पवना धरणाचे अभियंता ए.एम.गदवाल यांनी दै. “प्रभात’शी बोलताना सांगितले. अर्थात पुढील वर्षाच्या सप्टेंबरपर्यंत पुरेल इतके पाणी असतानाही पाणी कपातीचे शुक्लकाष्ठ नागरिकांची पाठ सोडत नसल्याचे दिसून येत आहे.