सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर
पुणे – गेल्या तीन महिन्यांपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा असला तरी सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागतो आहे. ऐन दिवाळीतही ही कपात सुरूच असल्याने या भागातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असून किमान सणांच्या दिवसांमध्ये तरी पूर्णवेळ पाणी देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
महापालिकेकडून सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज तसेच या भागांत वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कात्रज तसेच कोंढवा परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी, या भागात पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांच्या नाराजीचा सामना पालिका प्रशासनास करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेकडून जूनपासून वडगाव जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात केली आहे.
त्यासाठी या केंद्राच्या पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या भागाचे सात झोन केले असून या झोनमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणी कपात केली जाते. त्यामुळे या भागात संपूर्ण पावसाळा पाणी कपात सुरूच आहे. त्यानंतर आता सणांच्या दिवसांमध्येही ही कपात सुरूच आहे, दिवाळीसाठी या भागातील नागरिकांकडून घराच्या स्वच्छतेसाठीची कामे हाती घेतली असतानाच; पाणीकपातीमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच, सणानिमित्ताने घरी नातेवाईक आले असल्याने तसेच पाहुण्यांचा राबता वाढला असतानाच, या पाणी कपातीमुळे नागरिकांना विकतच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.
प्रशासनाचा कपातीबाबत बोलण्यास नकार
महापालिकेकडून पाणी कपातीबाबत बोलण्यास नकार देण्यात आला आहे. या भागातील कपात रद्द केल्यास त्याचा परिणाम कात्रज, कोंढवा भागांतील नागरिकांवर होणार आहे. त्यामुळे आहे तेच नियोजन कायम ठेवले जाणार आहे. ही कपात मागे घ्यायची झाल्यास धरणातून प्रतिदीन 1,700 एमएलडी पाणी मिळणे आवश्यक आहे. मात्र, तेवढे पाणी मिळणे शक्य नसल्याने वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याच्या कपातीचा निर्णय घेण्यात आला.