विद्युत मोटारींचा उपयोग टाळण्याची गरज
सातारा – राज्यात सर्वाधिक धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यावर पाणीबाणीचे संकट निर्माण झाले आहे. सध्या धरणांमधील पाणीसाठा फक्त पिण्यासाठीच आरक्षित केलेला असताना शेती आणि घरगुती वापरासाठी देखील पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारींचा उपयोग करण्याच्या घटना घडत आहेत. अशावेळी पालकमंत्र्यांनी आणि सातारा नगरपालिकेने देखील कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. परिणामी वादावादीचे प्रकार घडताना दिसून येत आहेत. वादावादीचे प्रसंग घडू नयेत त्याचबरोबर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याचा प्रसंग टाळण्याची गरज निर्माण झालेली आहे.
सर्वाधिक पाणीसाठा असलेल्या कोयना धरणामध्ये केवळ 16.41 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीसाठा फक्त पिण्यासाठी आरक्षित केल्यामुळे विद्युत निर्मिती बंद करण्यात आली आहे. तर धोममध्ये 2.26, कण्हेरमध्ये 2.29, उरमोडीमध्ये 1.31, तारळीमध्ये 1.149 आणि धोम-बलकवडीमध्ये 0.31 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आता ह्या पाणीसाठ्यापैकी एक थेंब ही शेतीसाठी वापरता येणार नाही.
परिणामी शेतातील ऊस पाण्याअभावी जळू लागला आहे तर नांगरट करून पेरणीसाठी शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. अशा स्थितीत खटाव तालुक्यातील तलावांमधून शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या मोटारी जप्त करताना प्रशासन आणि शेतकऱ्यांची वादावादी झाली. अधिकाऱ्यांनी हा प्रसंग पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर पालकमंत्र्यांनी जबरदस्तीने पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. एकूणच ह्या प्रसंगावरून दुष्काळाची आणि पाण्याच्या टंचाईची भीषणता स्पष्ट होते.
त्याचबरोबर सातारा शहरात देखील विद्युत मोटारी लावण्यावरून थेट पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांना धक्काबुक्की झाली. वास्तविक नगरपालिकेने काही दिवसांपुर्वीच विद्युत मोटारींचा वापर न करण्याचे आदेश जाहीर केले होते. मात्र, तरीही नागरिक विद्युत मोटारीचा वापर करताना दिसून येत आहे. खरे तर टंचाईच्या काळात पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज आहे.
केवळ व्यक्तीकेंद्रित विचार करून थेट नळाला मोटारी लावणे नैतिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या गैर आहे. आपल्या कुटुंबासह समाजाची देखील तहान भागली पाहिजे, असा विचार प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वाहने आणि अनावश्यक कपडे धुणे टाळले पाहिजे. पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याची बचत हीच निर्मिती विचार केला तर शिल्लक पाणीसाठा प्रत्येकाची तहान भागविणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि शहरी नागरिकांनी देखील वादविवादाचे प्रसंग टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.