दुष्काळी स्थितीत नदी, ओढे-नाले, बंधारे कोरडे पडलेले असल्याने तत्सम ठिकाणांहून मिळालेल्या गौण खनिजांची वाहतूक करताना अशा वाहनांतून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने रस्ते ओले होऊन अपघात घडत आहेत. दुष्काळी स्थितीत अशा प्रकारे पाणी वाया जात असताना प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष आहे.
दौंड तालुक्यातील बहुतांशी ओढे, नाले आटले आहेत. अशा ठिकाणांहून मिळणारे गौण खनिजही चिखलाने माखलेली असल्याने त्यावर पाणी मारले जाते. महसूल विभागाकडून होत असलेल्या कारवाईमुळे अशी वाहने गावाबाहेर आणून रस्त्यावर उभी केली जातात. चिखलाने माखलेली अशी गौण खनिजं धुण्याकरिता टॅंकरचे अथवा कूपनलिका किंवा विहिरींचे पाणी वापरले जाते. एका वाहनाकरिता किमान दोन ते तीन हजार लिटरपेक्षा अधिक पाण्याचा वापर केला जात असल्याने दुष्काळात अशा प्रकारे पाणी वाया जात असून, त्याचा गैरवापर केला जात आहे. हीच वाहने रस्त्यावर आणून उभी केली जात असल्याने ऐन दुष्काळात रस्त्यावर चिखल होत आहे. यामुळे रस्ते ओले होऊन वाहने घसरत आहेत आणि काही ठिकाणी अपघातही झाले आहेत.
दौंड शहर, तसेच अन्य राज्य मार्गावर हे चित्र सर्रास दिसत आहे. मात्र, वाहतूक पोलीस अशा वाहनांवर करवाई करीत नाहीत. दुष्काळी स्थितीतही पाणी गाळत चाललेली वाहने कशाची असतील, याचा अंदाज येऊनही कारवाई होत नाही. दौंड शहर तसेच अन्य रस्त्यावर अशा प्रकारची किमान 150 ते 200 वाहने दिसत असतील. प्रादेशिक परिवहन विभागाकडून काही नियम आखून दिलेले आहेत; परंतु हे नियम पाळले जात नाहीत. नियम मोडीत काढणाऱ्यांवर कारवाईचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुका पातळीवरील सर्व विभागीय कार्यालये तसेच पोलिसांना दिले आहेत, असे असताना कारवाई मात्र होत नाही. एकीकडे पाण्यासाठी पायपीट करण्याची स्थिती असताना दुसऱ्या बाजूला मात्र हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र असल्याने हे पाणी वाचविणार कोण आणि कारवाई करणार कोण, असे प्रश्न अनुत्तरीत राहतात.