मुंबई : मागच्या अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत केंद्राच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे सरकारसोबत चर्चा करूनही या मुद्द्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, शेतकऱ्यांनी आज ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. तर भाजपाच्या नेत्यांकडून शेतकरी आंदोलनाबद्दल खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही असल्याचा आरोप केला जात आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसनं भाजपाला कंगना रणौतला पाठिंबा दिल्याचं स्मरण करून देत खडेबोल सुनावले आहेत.
शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी संघटनांचा पाठिंबा असल्याचा आरोप भाजपा नेत्यांकडून करण्यात आला होता. त्याचबरोबर आंदोलनात नक्षलवादी आणि देशद्रोही असल्याचे काही भाजपा नेत्यांनी म्हटले होते. यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपाला सुनावले आहे.
देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या #भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलीसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 6, 2021
“देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वोतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलिसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?,” असा सवाल सावंत यांनी भाजपाला केला आहे.
शेतकरी आंदोलन सुरू झाल्यानंतर या आंदोलनात खलिस्तानवादी असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरून बरंच वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावरूनही भाजपा नेत्यांनी आंदोलक शेतकऱ्यांवर टीका केली होती.