मुंबई – भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व शिखर धवन यांच्या अपयशामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम होत आहे. मात्र, तरीही बीसीसीआय नवोदितांना संधी देण्यास टाळाटाळ करते, अशा शब्दात माजी कसोटीपटू वासीम जाफर याने टीका केली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित, धवन व कोहली यांनी मिळून 25 व 35 धावा केल्या आहेत. त्यांची गुणवत्ता व दर्जा पाहता ही सुमार कामगिरी ठरते. मात्र, तरीही निवड समिती सातत्याने त्यांचे संघातील स्थान का कायम ठेवते, असा सवालही जाफरने केला आहे.
जेव्हा भारतीय संघातील या पहिल्या तीन फलंदाजांनी सरस कामगिरी करत मोठी खेळी केली तर भारतीय संघ सातत्याने विजय मिळवतो. मात्र, हे चित्र गेल्या काही सामन्यांत दिसलेले नाही. उलट या खेळाडूंचे अपयशच संघाला भोवताना दिसत आहे. रोहित, कोहली व धवन यांचे हेच अपयश संघासाठी डोकेदुखी ठरत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 247 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 146 धावांवर संपला होता. तर या मालिकेतील अखेरच्या निर्णायक सामन्यातही सलामी चांगली मिळाली नव्हती. ऋषभ पंत व हार्दिक पंड्या यांनी सर्वोत्तम खेळी करत संघाला मालिका विजय मिळवून दिला होता. मात्र, हे तीन फलंदाज आपली जबाबदारी ओळखून कधी खेळणार, असा सवालही जाफरने केला आहे.