मुंबई – सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक आक्रमक झालेले दिसून येत आहेत. तर सत्ताधारी महविकास आघाडी सरकार अनेक मुद्द्यावर बॅकफूटवर गेल्याचं दिसून येतं. मात्र आज अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा करताना भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला चिमटे काढले. त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील त्यांना साथ दिली.
अजित पवार यांनी विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टीका केली. तुम्ही फार डोळ्यावर यायला लागले की बाजूला केलं जातं. एकनाथ खडसे यांच्या बाबतीत सर्वांना माहिती आहे. खडसे यांच्यानंतर काहींना वाटलं आपण वाचलो. त्यापैकी काहींचा विधानसभेत पराभव झाला. तर काहींना तिकीटं मिळाली नाही’ असा टोलाही अजितदादांनी लगावला.
दरम्यान परळी मतदार संघातून आमचे धनंजय मुंडे विजयी झाले. तिथे त्यांचा (पंकजा मुंडे) पराभव झाला. त्यांचा पराभव धनंजय यांच्यामुळे झाला की दुसऱ्या कुणामुळे झाला हे काही माहिती नाही’ असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर निशाना साधला. त्यामुळे पंकजा यांचा पराभव कुणामुळं झाला या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
तत्पूर्वी अनिल देशमुख यांनी देखील सुधीर मुनगंटीवार यांना टोले लगावले होते. तुम्ही तर सर्वात वरिष्ठ होते. मात्र तुम्हाला मुख्यमंत्रीपदासाठी डावलण्यात आलं. तरी तुम्ही कायम चेहऱ्यावर हास्य ठेवत होते. दुख: लपविण्यासाठीच ते कायम हसत होते, असंही देशमुख यावेळी म्हणाले.