मुंबई : राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेनेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निमंत्रण दिल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यातच आता शिवसेनेच सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस शिवसेनेसोबत असल्याच सूचक वक्तव्य शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. सर्वच नेत्यांचा एकमेकांशी प्रेमाचा संवाद सुरू आहे. प्रत्येक नेत्याला राज्याविषयीच्या कर्तव्यांची जाण आहे. राज्यात अस्थिरता राहू नये. राष्ट्रपती राजवटी आणण्याचा प्रयत्न होतोय. त्याला आव्हान द्यावं यासाठी शिवसेना कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांचे एकमत आहे. तत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगू नये, भाजपा पीडीपी युती लव्ह जिहाद होता का?, असा सवाल राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेला सत्ता स्थापनेच आमंत्रण मिळाल्यानंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करणार असल्याचं सांगितलं. राऊत म्हणाले, भाजपा सत्ता स्थापन करू शकला नाही. याचं खापर शिवसेनेवर फोडण चुकीचे आहे. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार कार्यवाही झाली असती तर ही वेळ भाजपावर आली नसती. प्रसंगी विरोधी पक्षात बसू पण, शिवसेनेला मुख्यमंत्री पद देणार नाही, अशी अंहकाराची भूमिका घेतल्यानं भाजपावर ही वेळ आली आहे. स्थिर सरकार देण्याची जबाबदारी भाजपाचीच होती, असे राऊत यांनी भाजपाविषयी बोलताना स्पष्ट केले.