नारायणगाव – पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या मोजणीला वारूळवाडीच्या बाधित शेतकऱ्यांनी हिरवा कंदील दिला आहे. जमिनीचे दर ठरवितांना जिल्हाधिकारी, प्रांत, बाधित शेतकरी, कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी, नगर रचना विभाग एकत्रित बसून निश्चित करणार आहेत.
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कुठलाही निर्णय घेण्यात येणार नाही असे महारेलचे उपमहाव्यवस्थापक सिद्धलिंग शिरोळे यांनी सांगितले. महारेलचे उपमहाव्यवस्थापक सिद्धलिंग शिरोळे, सहाय्यक व्यवस्थापक मंदार विचारे, समन्वयक चंद्रकांत भोर, महसूलचे डी. बी. काळे, संजय सईद, गणेश गाडगे व बाधित शेतकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे टोमॅटो मार्केट वारूळवाडी येथे असून अष्टविनायक रोड, पुणे- नाशिक महामार्ग, शाळा, महाविद्यालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, कृषी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, उत्पादन शुल्क विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांसारखी प्रशासकीय कार्यालये वारुळवाडीत असल्याने कार्गो स्टेशन नारायणगाव हद्दीत झाल्यास वारूळवाडीकरांना कार्गो स्टेशनकडे मालाची ने आण करण्यासाठी नदी पुलावर रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूने प्रशस्त पूल व रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली.
यावेळी अभय कोठारी, प्रशांत शहा, गणपत अडसरे, अशोक अडसरे, अनिल भुजबळ, अर्जुन अडसरे, सुभाष अडसरे, अविनाश कांबळे, दशरथ अडसरे, विराज फुलसुंदर, रामदास खोकराळे, बजरंग नाईक, वैभव भुजबळ, अतुल अडसरे, चंद्रकांत अडसरे, वसंत अडसरे, ईश्वर अडसरे, नारायण अडसरे, सुधीर भुजबळ, दत्ता भुजबळ, अनसू काळे, आत्माराम संते उपस्थित होते.
जमिनीचे बाजार भाव, बाधितांना नुकसान भरपाई देताना घर, शेड, फळबागा, पाइपलाइन, आयुर्वेदिक झाडे, विहीर, बोरवेल याचा विचार करण्यात यावा व सद्यस्थितीतील पिक पाहणी करणे, भूमिहीन व अल्पभूधारक बाधितांसाठी नोकरी, कार्गो स्टेशन किंवा रेल्वे स्टेशन वारूळवाडी परिसरात उभारण्यात यावे.
-प्रा. राहुल गरुड, बाधित शेतकरी
महारेलचे उपमहाव्यवस्थापक म्हणतात…
भूमिहीन शेतकऱ्यांना पुनर्स्थापित करण्यात येईल, भूमिहीनांना रेल्वेत नोकऱ्या दिल्या जातील, रेल्वे मार्गालगत शेतकऱ्यांची पाच किंवा दहा गुंठे जमिनीचे क्षेत्र शेतकऱ्यांना वापरायोग्य नसेल तर महारेलने ठरविलेल्या दराप्रमाणे खरेदी केले जाईल, शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी 750 मीटर वर अंडरपास तसेच दोन्ही बाजूने पाच मीटर पक्का रस्ता तयार केला जाईल, सातबारावर असलेल्या पीक पाहणीनुसार पंचनामे केले जाणार नाहीत तर प्रत्यक्ष शेतीची पाहणी करून पंचनामे केले जातील.