मुंबई – प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात हजर न राहिल्याने मुंबईच्या न्यायालयाने अभिनेत्री कंगना राणावत विरोधात वॉरंट जारी केला आहे. समन्स बजावूनही कंगना न्यायालयात हजर न राहिल्याने हा वॉरंट जारी करण्यात आला आहे. यामुळे कंगनाच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे.
गीतकार जावेद अख्तर यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाने अभिनेत्री कंगनाला समन्स बजावला होता. तत्पूर्वी जावेद अख्तर मानहानी प्रकरणाचा तपास करणे आवश्यक असल्याचे मुंबई पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. डिसेंबर 2020 मध्ये, अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने जुहू पोलिसांना मानहानीच्या तक्रारीचा तपास करण्याचे निर्देशही दिले होते.
पण समन्स बजावूनही कंगना चौकशीसाठी हजर राहिली नाही. याउलट तिने संबंधित समन्सच्या बातमीच्या ट्वीटला कोट करत आणखी एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. “सर्व गिधाडांच्या झुंडीसमोर एकटी वाघीण आहे, मजा येईल’ अशा आशयाचे ट्वीट कंगनाने केले होते.